प्रशासकीयब्रेकिंग न्युज

शासन गरजू व्यक्तींच्या पाठीशी खंबीरपणे उभे – ठाकूर

आठवडा विशेष टीम―

अमरावती, दि. १४ :  कोरोना महासंकटात गरजू विद्यार्थ्यांच्या पुस्तकांच्या मागणीची तातडीने दखल घेऊन राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी या विद्यार्थ्यांना पुस्तके मिळवून दिली.

खारतळेगाव येथील विद्यार्थ्यांनी पुस्तकांची मागणी केली होती. या विद्यार्थ्यांनी दहावी व बारावीच्या परीक्षेत उत्कृष्ट गुण मिळवले मात्र, घरची बिकट परिस्थिती व कोरोना महासंकटामुळे निर्माण झालेल्या अडचणी यामुळे आर्थिक समस्या उभी राहिली. त्यामुळे पुढील शिक्षणासाठी पुस्तके मिळवून देण्याची मागणी करणारे निवेदन या विद्यार्थ्यांनी दिले. पालकमंत्र्यांनी तातडीने या मागणीची दखल घेऊन या २५ विद्यार्थ्यांना पुस्तके मिळवून दिली.

अमरावतीच्या शासकीय विश्रामगृहात पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांच्या हस्ते या पुस्तकांचे वितरण विद्यार्थ्यांना करण्यात आले. जिल्हा परिषदेचे माजी सभापती जयंतराव देशमुख यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.

कोरोना संकटकाळात अनेक अडचणी येत असल्यातरी त्यावर मात करून पुढे जाण्याचा प्रयत्न होत आहे. गरीब व गरजू व्यक्तींसाठी शासनाकडून अनेक नवे निर्णय, उपक्रम राबवले जात आहेत. शासन वंचितांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे, अशी ग्वाही पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी यावेळी दिली.

या अडचणीच्या काळात पालकमंत्र्यांकडून पुस्तके मिळाल्यामुळे शिक्षणासाठी मोठी मदत झाली, आमच्या पालकांनाही समाधान वाटले, अशी प्रतिक्रिया यावेळी विद्यार्थ्यांनी व्यक्त केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Back to top button