Last Updated by संपादक
आठवडा विशेष टीम―अमरावती, दि. 1 : मूग, उडीद खरेदीला सुरुवात व सोयाबीन खरेदीसाठी ऑनलाईन नोंदणीला सुरुवात झाल्यानंतर आता कापूस खरेदी हंगाम 2020-21 ची पूर्वतयारीही शासनाकडून करण्यात येत आहे. जिल्ह्यातही कापूस खरेदीच्या दृष्टीने सुरुवातीपासूनच नियोजन करण्याचे निर्देश राज्याच्या पालकमंत्री ॲड.यशोमती ठाकूर यांनी दिले आहेत.
राज्यात कोरोनाची परिस्थिती असतानाही पणन विभागाने राज्यात गत 10 वर्षातील सर्वाधिक विक्रमी कापसाची खरेदी केली. अमरावती जिल्ह्यातही खरेदी केंद्रांची संख्या वाढविणे, खरेदीसाठी मनुष्यबळ उपलब्ध करून देणे आदी विविध उपाययोजनांतून मोठी कापूस खरेदी झाली आहे. येत्या हंगामातही मोठ्या प्रमाणावर कापूस खरेदी होण्यासाठी योग्य नियोजन करण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले आहेत.
पणन विभागाकडून कपास निगम व पणन महासंघाला विविध सूचना देण्यात आल्या आहेत. जिनिंग प्रेसिंग फॅक्टरी यांच्याशी समन्वय ठेवून कापूस खरेदीचे नियोजन करून प्रत्येक कापूस खरेदी केंद्रावर किमान एक ग्रेडर असावा. कापूस खरेदी पूर्वीच कृषि विभागामार्फत आवश्यक ते मुनष्यबळ ग्रेडर म्हणुन उपलब्ध करुन घेऊन त्यांना हंगामपूर्व प्रशिक्षण देऊन नेमणुकीचे आदेश द्यावेत. खरेदी केलेला कापूस साठवणुकीची व्यवस्था, सोयी सुविधा इतर नैसगिक आपत्तीपासून संरक्षण करण्याच्या दृष्टीने गोदाम, शेड, ताडपत्री इ.व्यवस्था करावी. बाजार समितीच्या स्तरावर शेतकरी निहाय नोंदवही/रेकॉर्ड ठेवले जावे. ज्यामध्ये कापूस उत्पादक शेतकऱ्यांचे नाव, पत्ता, बँक खात्याचा तपशील असावेत. कापूस खरेदी केंद्रावर आणण्यापूर्वी संबंधित शेतकऱ्यांना कापूस खरेदीचे ठिकाण व वेळ एस.एम.एस.द्वारे पाठविण्यात यावे. याबाबत कृषि उत्पन्न बाजार समिती समन्वय ठेवून भारतीय कपास निगम, कपास भवन व महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादक यांनी नियोजन करावे, कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता शेतकऱ्यांची एकाच वेळी खरेदी केंद्रावर गर्दी होणार नाही या दृष्टीने सर्व उपाययोजना करावी. तसेच गाडी पार्किंग, शेतकऱ्यांना बसण्याची व्यवस्था करावी, आदी सूचनाही देण्यात आल्या आहेत.
000