महापरिनिर्वाण दिनापासून जीवनदान महाअभियानास प्रारंभ
अंबाजोगाई:आठवडा विशेष टीम―
सध्याच्या काळात राज्यभरात रक्ताचा प्रचंड तुटवडा निर्माण झालेला आहे.राज्यामध्ये उपलब्ध असलेला रक्तसाठा अतिशय कमी आहे.जनतेने स्वयंस्फुर्तीने रक्तदान करावे असे आवाहन विविध स्तरांमधून करण्यात येत आहे.ही बाब लक्षात घेता काँग्रेस पक्षाने आजपासून म्हणजेच दि.६ डिसेंबर २०२० (महापरिनिर्वाण दिन) ते दि.२० डिसेंबर २०२० या कालावधीत “जीवनदान महाअभियान” राबविण्याचे ठरविले आहे.या महाअभियाना अंतर्गत बीड जिल्ह्यात काँग्रेस पक्षाच्या वतीने रक्तदान शिबीर आयोजित करण्यात येणार आहे.राज्याचे मुख्यमंत्री मा.उध्दवजी ठाकरे यांच्या आवाहनानुसार तसेच
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा महसूल मंञी ना.बाळासाहेब थोरात यांच्या सुचनेवरून बीड जिल्हा काँग्रेस कमिटीचे सर्व सन्माननीय पदाधिकारी,फ्रंटल ऑर्गनायझेशन,विविध सेलचे प्रमुख,जिल्हाध्यक्ष,तालुका,शहर,ग्रामीण काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांना कळविण्यात येते की, कृपया आपल्या तालुक्यातील प्रत्येक ब्लॉक मध्ये वरील काळात रक्तदान शिबीर आयोजीत करावे व जास्तीत जास्त रक्त संकलीत करून रक्तपेढीला पाठविण्याची व्यवस्था करावी ही विनंती असे आवाहन बीड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष राजकिशोर मोदी यांनी केले आहे.
याबाबत राज्य सरकारचे वतीने नुकतेच कोरोना काळात राज्यातील रूग्णालयांमध्ये रक्ताची टंचाई भासत असून राज्यातील जनतेने स्वयंस्फूर्तीने पुढे येऊन रक्तदान करावे असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे.तसेच महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा महसूल मंञी ना.बाळासाहेब थोरात यांच्या सुचनेवरून रविवार,दिनांक 13 डिसेंबर रोजी अंबाजोगाईत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. महाविद्यालयातील युवा वर्ग हा नेहमीच रक्तदानासाठी महत्वाचा स्त्रोत राहीलेला आहे.मात्र,कोविड-19 च्या प्रादुर्भावामुळे सध्या महाविद्यालये बंद आहेत.तसेच रक्तदानात अग्रेसर असणा-या ब-याच मोठ्या कंपन्या, कॉर्पोरेट हाऊस यांच्या कडून वर्क फ्रॉम होम सुरू असल्यामुळे रक्त संकलनामध्ये मोठ्या अडचणी येत आहेत. कोरोना विरूद्धच्या लढाईत राज्यातील डॉक्टर्स,पोलीस, आरोग्य कर्मचारी हे आपले योगदान देत आहेत.या लढाईसाठी आवश्यक औषधे,सुविधांची कमतरता भासू नये यासाठी शासनस्तरावरून सर्व उपाययोजना करण्यात आल्या आहेत.परंतू,राज्यातील रक्तपेढ्यांमध्ये रक्ताचा साठा कमी असल्याने रुग्णांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. सध्या महाराष्ट्रातील 344 रक्तपेढ्यांमध्ये केवळ 5 ते 7 दिवस पुरेल एवढाच हा साठा असल्याची माहिती मिळत आहे.ही बाब चिंतेची आहे.
रक्तदान शिबीरांचे आयोजन
या पार्श्वभुमीवर येत्या काळात रक्ताचा तुटवडा भासू नये यासाठी राज्यातील राजकीय,धार्मिक,सामाजिक संस्था व गृहनिर्माण सोसायटी यांनी कोरोनाविषयक काळजी घेऊन छोट्या-छोट्या रक्तदान शिबीरांचे आयोजन करावे. स्वैच्छिक रक्तदात्यांनी देखील नजीकच्या रक्तपेढी मध्ये जाऊन रक्तदान करावे.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रक्तपेढ्यांमार्फत आवश्यक त्या तपासणी चाचण्या व प्रतिबंधक उपाययोजना करून रक्त संकलन करण्यात येणार आहे.कोरोनाच्या काळात रूग्णांना जीवनदान देण्याकरिता सर्वांनी पुढे येऊन दर तीन महिन्यांनी रक्तदान करावे असे आवाहन सन्माननिय मुख्यमंत्री यांनी केले आहे हे स्वागतार्ह आहे.कारण,यापूर्वी बीड जिल्हा काँग्रेसच्या वतीने संपूर्ण लॉकडाऊन काळात सुमारे 700 हून अधिक जणांनी रक्तदान करून सरकारच्या आवाहनाला वेळोवेळी प्रतिसाद दिला आहे.तसेच काँग्रेस पक्षाने आजपासून म्हणजेच दि.६ डिसेंबर २०२०(महापरिनिर्वाण दिन) ते दि.२० डिसेंबर २०२० या कालावधीत “जीवनदान महाअभियान” राबविण्याचे ठरविले आहे.या महाअभियाना अंतर्गत बीड जिल्ह्यात काँग्रेस पक्षाच्या वतीने रविवार,दिनांक 13 डिसेंबर 2020 रोजी अंबाजोगाईत रक्तदान शिबीर आयोजीत करण्यात येणार आहे.तरी या महाअभियानात काँग्रेस पक्षासहीत महाविकास आघाडीतील सर्व समविचारी पक्ष यांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते,सामाजिक संघटना,स्वयंसेवी संस्था यांनी सहभागी व्हावे.
―राजकिशोर मोदी (अध्यक्ष,बीड जिल्हा काँग्रेस कमिटी.)