आठवडा विशेष टीम―पुणे, दि.१:- उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी आज कोरेगाव भीमा (पेरणे फाटा) येथील जयस्तंभास पुष्पचक्र अर्पण करुन अभिवादन केले.
कोरेगाव भीमा जयस्तंभास अभिवादन करण्यासाठी दरवर्षी येणाऱ्या नागरिकांच्या भावनांबद्दल उपमुख्यमंत्र्यांनी आदर व्यक्त केला आहे. ते म्हणाले, महाराष्ट्र ही शौर्याची भूमी आहे. अनेक प्रसंगात येथील नागरिकांनी शौर्य दाखविले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक सण, उत्सव, महापुरुषाच्या जयंती साजरी करीत असताना नागरिकांनी शासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देत शांततेत कार्यक्रम साजरे केले आहेत. कोरोना विषाणूपासून संरक्षण करीत असताना आपल्या कुटुंबियांसोबत नागरिकांची काळजी घेणे आपले कर्तव्य आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गृह विभाग व प्रशासनाने नागरिकांना केलेल्या आवाहनानुसार नागरिकांनी गर्दी टाळत घरातूनच या शूरवीरांना अभिवादन करावे, याकरिता प्रशासनाच्या वतीने कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण दूरदर्शन, युट्यूब आणि फेसबुक या समाज माध्यमावर करण्यात आले. नागरिकांनी कोणत्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.