यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय ई-चर्चासत्राचे आयोजन
अंबाजोगाई:आठवडा विशेष टीम― 'जागतिक स्तरावर भारतीय भाषा,संस्कृती आणि साहित्याची परस्परपूरकता’ या विषयावरील आंतरराष्ट्रीय ई-चर्चासत्राचे आयोजन यशवंतराव चव्हाण महाविद्यालय,अंबाजोगाई आणि जनविकास महाविद्यालय, बनसारोळा यांच्या संयुक्त विद्यमाने दि.19 जानेवारी 2021 रोजी अंतर्गत गुणवत्ता हमी विभाग व हिन्दी विभागामार्फत करण्यात आले होते.
जागतिक स्तरावर दि.10 जानेवारी हा दिवस विश्व हिन्दी भाषा दिवस म्हणून साजरा करण्यात येतो.या प्रसंगाचे औचित्य साधून या आंतरराष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते.या चर्चासत्रास मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष आमदार प्रकाशदादा सोळंके,सरचिटणीस आमदार सतिशभाऊ चव्हाण,रमेशराव आडसकर,दत्ताञय पाटील,डॉ.नरेंद्र काळे व महाविद्यालय विकास समितीचे मार्गदर्शन लाभले.याप्रसंगी दिल्ली विद्यापीठ,दिल्ली येथील प्रसिध्द साहित्यिक व समीक्षक डॉ.अलोकरंजन पाण्डेय यांनी भारतीय संस्कृती,समाज आणि साहित्य यांची पारस्परपूरकता व्यक्त करतांना साहित्याची परंपरा स्पष्ट केली.भाषेचा सेतु या सर्व आधारांना बांधुन ठेवून सर्वांना सामावून घेतो म्हणून भाषा ही एकांगी नसून त्यात समाज त्याची सभ्यता,संस्कृती आणि साहित्य समाविष्ट होत असते असे अनेक दाखल्यातून स्पष्ट केले.लिसबॉन विद्यापीठ,पोर्तुगाल येथील प्रोफेसर शिवकुमार सिंह यांनी भारतीय भाषा,संस्कृती आणि साहित्य जगात आपला प्रभाव निर्माण करत असल्याचे समकालीन दाखले दिले.त्यांनी पोर्तुगाली व हिन्दी भाषेतील आदान-प्रदान स्पष्ट करतांना या दोन्ही देशाचे असलेले पारस्पारिक संबंध स्पष्ट केले.त्यांनी आपल्या वैचारिक मांडणीतून अनुवाद आणि प्रवासी भारतीय साहित्यातून भारतीयतेची जगात नवी ओळख निर्माण होत असल्याचे प्रतिपादन केले.त्याचे श्रेय भारतीय तत्वज्ञानाचे 'सुखांत’ सूत्रात असून जगाला सत्याची बाजू पटवून दिल्याचे सांगितले.याप्रसंगी दुस-या विदेशी व्याख्याता कोलंबो विद्यापीठ,श्रीलंका येथील प्रोफेसर रिदमा निशादिनी लंसकारा यांनी भारताची विविधतेतून एकतेची आपली शक्ती जगात वेगळी ओळख निर्माण केली असल्याचे सांगितले.भारतातील अनेक भाषा,अनेक सभ्यता,जूळवून घेवून निर्माण होणारी भारतीय संस्कृती आणि जाणिवेचे साहित्य जगात आजरामर असल्याचे सांगितले.श्रीलंका व भारत एकाच नाण्याच्या दोन बाजू असून जागतिकीकरणाच्या दबावात भारतीय भाषा आपला प्रभाव निर्माण करतांना जागतिक बाजाराची भाषा आवगत करत आहेत.त्यामुळे भारत भविष्यात जगाचे नियंत्रण करणारा देश असेल असेही नमूद केले.भारतीय सिनेमा कलावंत आखिलेन्द्र मिश्र,मुंबई हे या आंतरराष्ट्रीय चर्चासत्राचे आकर्षण होते.त्यांनी आपल्या अनोख्या शैलीतून भारतीय तत्वज्ञान जगात श्रेष्ठ असून त्यातुन जगण्याची नवी दिशा व ऊर्जा मिळते.भारतीय सामाजिक रचना व त्याची जाणीव ही भारतीय भाषा,समाज व संस्कृतीचे जतन,संवर्धन व आदान-प्रदान ही साहित्याची बाजू असल्याचे नमूद करतांना बॉलीवूडने ते जगात पोहचविल्याचे आवर्जून सांगितले.आम्ही समृध्द परंपरेचे वारसदार आहोत.त्यामुळे आपण जगातील चांगल्या गोष्टींचा जास्त स्विकार करावा पण,अंधानुकरण करू नये असेही नव्या पीढीच्या वाटचालीस उपदेशात्मक सांगितले.या चर्चासत्राची सुरूवात मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक विनायकराव पाटील व यशवंतराव चव्हाण यांच्या प्रतिमापूजनाने व गुजरात येथील प्रा.डॉ.सुशिला व्यास यांच्या स्वागतगीताने झाली.प्राचार्य डॉ.बाबासाहेब गोरे यांनी शुभेच्छा संदेश दिला.तर हिन्दी विभागाचे प्रोफेसर डॉ.मुरलीधर लहाडे यांनी प्रास्ताविक केले.ज्यांच्या सहकार्याने या आंतरराष्ट्रीय ई-चर्चासत्राचे आयोजन करणे सहज सोपे झाले असे विश्वहिन्दी संगठन,नवी दिल्लीचे डॉ.अलोकरंजन पाण्डेय,डॉ.कोयल विश्वास,डॉ.आरती यांचे योगदान लाभले.या चर्चासत्राचा अध्यक्षीय समारोप यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ.वनमाला गुंडरे यांनी केला.तर ई चर्चासत्रात सहभागी सर्वांचे आभार डॉ.गोपाळ भोसलेंनी मानले.या चर्चासत्रात देश-विदेशातून 1500 प्राध्यापक,संशोधक व विद्यार्थ्यांनी सक्रीय सहभाग नोंदवला होता.