आठवडा विशेष टीम―
अमरावती दि. 27 : गुरुकुंज उपसा सिंचन योजनेमुळे 18 हजार एकर जमिन सिंचनाखाली येणार असून, परिसरातील कृषी उत्पादकता वाढेल व शेतक-यांचे जीवनमान उंचावणार आहे, असे प्रतिपादन महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी आज येथे केले.
गुरुकुंज उपसा सिंचन योजनेच्या कामाची पाहणी पालकमंत्र्यांनी आज केली, त्यानिमित्त मोझरी येथील दास टेकडी येथे आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. अधिक्षक अभियंता रश्मी देशमुख, तहसीलदार वैभव फरतारे, माजी जलसंपदा अधिक्षक अभियंता रमेश ढवळे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
पालकमंत्री श्रीमती ठाकूर म्हणाल्या की, जिल्ह्यात सिंचनाचे क्षेत्र वाढावे यासाठी पूर्वीपासून निरंतर प्रयत्न होत आहेत. माजी आमदार स्व. भैय्यासाहेब ठाकूर यांनी 1984 मध्ये शेतकरी बांधवांना सिंचनासाठी पाणी मिळण्यासाठी या उपसा सिंचन योजना प्रकल्पाची मागणी केली. परिसरातील शेतीत पाणी पोहोचून शेतकरी बांधवांना बारमाही सिंचनाची सुविधा निर्माण व्हावी, असे त्यांचे स्वप्न होते. त्याची पूर्ती या योजनेच्या साकारण्यातून होत आहे. योजना पूर्णत्वास जाण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करत विविध तांत्रिक अडचणींवर मात करण्यात आली. त्यानुसार उर्ध्व वर्धा सिंचन प्रकल्प योजनेंतर्गत गुरुकुंज उपसा सिंचन योजना साकारण्यात येत आहे. या योजनेमुळे गुरुदेवनगर, मोझरी, शेंदोळा (खु.), विचोरा, मालेगाव, फत्तेपूर, शिवणगाव, कोळवण, शेंदुरजन (बु.), शेंदुरजन (खु.), अनकवाडी, रघुनाथपूर, रंभापूर, पाळवाडी, काडगव्हाण, अदमपूर, धोटे, व-हा, भांबोरा, वाठोडा, मालधूर, शिरजगाव आदी 22 गावांना व सुमारे सात हजार 109 हेक्टर शेतीला या प्रकल्पाचा लाभ होणार आहे. प्रकल्पाच्या कामांनी गती घेतली असून, विंचोरी येथे उपकालव्याद्वारे शेतापर्यंत पाणी पोहोचले आहे. लवकरच इतर कामही पूर्ण होईल.
पूरक व्यवसायांनाही चालना देणार
पालकमंत्री श्रीमती ठाकूर पुढे म्हणाल्या की, शेतीसोबत पूरक व्यवसायही वाढीस लागावेत, असे प्रयत्न होत आहेत जेणेकरून सिंचनाने कृषी उत्पादकता वाढण्याबरोबरच उत्पन्नाचे पर्यायी मार्गही उभे राहतील. सुमारे 7 हजार 109 हे. लाभक्षेत्र असलेल्या या प्रकल्पासाठी उर्ध्व वर्धा प्रकल्पाच्या उजव्या मुख्य कालव्यावरून पाणी उचल होणार आहे.
000000