आठवडा विशेष टीम―
नाशिक दि. 15 एप्रिल 2022 (आठवडा विशेष वृत्तसेवा): कोरोनाकाळ निश्चितच वाईट होता. अनेक कुटुंबे उध्वस्त,निराधार झाली. अनेकांचे पालकत्व हिरावले गेले. अशा कुटुंबियांचे पुनर्वसनात नाशिक जिल्हा प्रशासनाचे काम चांगले आहे. तसेच जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्देशाने
कोरोनात विधवा झालेल्या भगिनींना मालमत्तेत हक्क मिळणार आहे, असे प्रतिपादन विधानपरिषद उप सभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी त्र्यंबकेश्वर येथे केले आहे.
त्र्यंबकेश्वर येथील शासकीय विश्रामगृह येथे अधिकाऱ्यांशी चर्चा करतांना विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे बोलत होत्या. यावेळी इगतपुरीचे प्रांताधिकारी अधिकारी तेजस चव्हाण, मुख्याधिकरी संजय जाधव, नायब तहसीलदार सतीश निकम उपस्थित होते.
विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे पुढे म्हणाल्या की, कोरोनात निराधार झालेल्या पाल्यांची आणि मदतीसाठी पात्र कुटुंबांची यादी सोबत आणली असून, त्याबाबतचा पाठपुरावा करणार आहे. नाशिक जिल्हाधिकाऱ्यांनी कोरोनात आधार गमावलेल्यांचे पुनर्वसनाचे खूप चांगले काम केले आहे. विशेष म्हणजे कोरोनात विधवा आलेल्या भगीनींना मालमत्तेचा अधिकार मिळावा, असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले होते. त्यामुळे अनेकांना आधार मिळाला. कोरोनात पालकत्व गमावलेल्या मुलांसाठी राज्य आणि केंद्र शासनाने काही योजना सुरू केल्या आहेत. त्यामुळे आता परिस्थिती सुधारतांना दिसत आहे. पण आधार गमावलेल्या या कुटुंबांच्या पाठीशी समाजानेही उभं राहणं तितकेच गरजेचे आहे. तसेच ज्यांच्या घरातील कमावणारी व्यक्ती, व्यावसायिक कोरोनात दगावली आहे, अशा कुटुंबातील वारसदारांना पुढील व्यवसायासाठी कागदपत्रे हस्तातंरीत करून देणे, अनुदान देणे, त्यांना कर्ज उपलब्ध करून देणे, बाजारपेठेतील सामुग्री मिळवून देणे यासाठी जिल्हा मदत केंद्र, महिला आर्थिक विकास महामंडळ, विविध बँका यांच्यामार्फत मदत करण्यासाठीही प्रयत्न सुरू असल्याचेही डॉ.गोऱ्हे यांनी यावेळी सांगितले.
कर्ज पुरवठा करणाऱ्या संस्थांनी माणुसकी जपावी
डोक्यावर कर्जाचा बोझा असलेली व्यक्ती जेव्हा दगावते, अशावेळी कर्ज घेताना विमा केलेला असल्याने ही कर्ज आपोआप माफ होतात. मात्र असे निदर्शनास आले आहे की काही पतसंस्था, कर्ज देणाऱ्या खासगी संस्था अशा कुटुंबांना वेठीस धरतात, कर्ज वसुलीसाठी नोटिसा पाठवतात, हे योग्य नसून, संकटात सापडलेल्या कुटुंबाबत आपण माणुसकी जपायला हवी. आता मी स्वत: अशा प्रकरणांमध्ये लक्ष घालणार आहे, असे आश्वासनही डॉ. गोऱ्हे यांनी यावेळी दिले आहे.
त्र्यंबक, नाशिक, चांदवडशी कौटुंबिक ऋणानुबंध
नाशिक हे आमच्या पूर्वजांचे गाव आहे. सात ते आठ पिढ्यांपूर्वी चांदवडला आमचे पूर्वज राहत होते. त्यानंतर ते काही काळ त्र्यंबकेश्वरमध्ये होते. त्यामुळे नाशिक, त्र्यंबक आणि चांदवडशी आमचे ऋणानुबंध जोडले गेले आहेत. माझं नाशिक जिल्ह्याशी अंतकरणाचे नातं आहे, अशा आठवणींनाही यावेळी नीलम गोऱ्हे यांनी उजाळा दिला.
माहिती जनसंपर्क विभाग सदैव तत्पर
कोरोना काळ असो वा इतर महत्त्वाच्या घडामोडी राज्याचा माहिती आणि जनसंपर्क विभाग सतत तत्पर असतो. करोनाकाळात या विभागाचे काम कौतुकास पात्र आहे. बदलत्या काळानुसार आताच्या समाजमांध्यमांवरही या विभागाचे काम झळकत असते, अशा शब्दात नीलम गोऱ्हे यांनी माहिती आणि माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे कौतुक केले.