प्रशासकीय

सामाजिक समता अबाधित राखून महाराष्ट्र भूमीला विकासवाटेवर अग्रेसर ठेऊ – सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे

आठवडा विशेष टीम―

महाराष्ट्र दिनानिमित्त राज्यात सामाजिक न्यायाचा जागर

बीड (दि. 30) – : महाराष्ट्र हे स्वतंत्र राज्य अस्तित्वात येण्यासाठी असंख्य वीरांनी बलिदान दिले. राज्याला संत, महात्मे, महापुरुष, वैविध्यपूर्ण संस्कृतीचा प्रदीर्घ वारसा लाभलेला आहे. राज्याच्या जडणघडणीत व विकास वाटचालीत देखील अनेक नेतृत्वांचे भरीव योगदान आहे. याच परंपरेला अबाधित राखत व सामाजिक समता व ऐक्य अबाधित ठेऊन महाराष्ट्र भूमीला विकासाच्या वाटेवर अग्रेसर ठेऊ, असे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांनी महाराष्ट्र दिन व कामगार दिनानिमित्त दिलेल्या शुभेच्छा संदेशात म्हटले आहे.

धनंजय मुंडे यांनी बीड, परभणी जिल्ह्यासह राज्यातील जनतेला महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

भारतीय स्वातंत्र्याचा यावर्षी आपण अमृत महोत्सव साजरा करत आहोत; त्याचबरोबर येत्या 6 मे रोजी लोकराजा छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या स्मृती शताब्दी निमित्त कृतज्ञता पर्व साजरे केले जात आहे. याच अनुषंगाने सामाजिक न्याय विभागामार्फत राज्यभरात महाराष्ट्र दिनाच्या दिवशी ध्वजारोहण समारंभाच्या वेळी सामाजिक न्याय विभागाच्या योजनांची माहिती ग्रामीण व शहरी भागात देण्यात येणार आहे.

विभागाच्या योजना तळागाळातील शेवटच्या गरजू व्यक्ती पर्यंत पोहोचाव्यात हा या उपक्रमाचा उद्देश असून, सामाजिक न्याय विभागाने याची जय्यत तयारी केली आहे; सर्व जिल्ह्यातून या उपक्रमास चांगला प्रतिसाद मिळेल, अशी अपेक्षा धनंजय मुंडे यांनी व्यक्त केली आहे.

0000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Back to top button