प्रशासकीय

पर्यावरण दिनानिमित्त उद्या ‘माझी वसुंधरा’ अभियानात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या संस्था आणि अधिकाऱ्यांचा सन्मान

आठवडा विशेष टीम―

मुंबई, दि. 4- वातावरणीय बदलाचे दुष्परिणाम रोखण्यासाठी राज्य शासनाच्या वतीने विविध उपायोजना केल्या जात आहेत. याचाच एक भाग म्हणून ‘माझी वसुंधरा अभियान 2.0’ हे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये राबविण्यात येत आहे. याअंतर्गत सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था, विभागीय व जिल्हास्तरावरील अधिकाऱ्यांचा सन्मान रविवार 5 जून 2022 रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या कार्यक्रमात करण्यात येणार आहे.

मुंबईतील टाटा थिएटर, एनसीपीए, नरिमन पॉईंट येथे हा कार्यक्रम आयोजित केला असून उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री आदित्य ठाकरे, पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील, पर्यावरण व वातावरणीय बदल राज्यमंत्री संजय बनसोडे यांची यावेळी प्रमुख उपस्थिती असणार आहे.

वातावरणात होत असलेले बदल आणि त्याचे दुष्परिणाम आपल्या दाराशी आले आहेत. हे सत्य स्वीकारून त्यावर तातडीने उपाययोजना करण्यासाठी राज्य शासनामार्फत विविध उपक्रम राबविले जात आहेत. पर्यावरण रक्षणासाठी भूमी, जल, वायू, अग्नी, आकाश या पंचतत्वांवर शासन काम करीत असून यासाठी राबविण्यात येत असलेल्या ‘माझी वसुंधरा’ उपक्रमाद्वारे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांनी पर्यावरणाच्या सुधारणेसाठी संभाव्य कृती बिंदू ओळखावे यावर लक्ष केंद्रित केले जात आहे. वातावरणीय बदलांचे गांभीर्य लक्षात घेता यावर उपाययोजना करण्याची हीच योग्य वेळ असल्याने शासनस्तरावरून आवश्यक ते सर्व प्रयत्न करण्यात येत आहेत.

000

ब्रिजकिशोर झंवर/विसंअ

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Back to top button