आठवडा विशेष टीम―
यवतमाळ, दि.३० (जिमाका) : भारतीय कृषी अनुसंधान परिषदेच्यावतीने जिल्ह्यात दि.२९ मे ते १२ जून या कालावधीत विकसित कृषी संकल्प अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत कृषी शास्त्रज्ञ थेट गावात जाऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणार आहे, त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी या अभियानाचा लाभ घ्यावे, असे आवाहन पालकमंत्री संजय राठोड यांनी केले आहे.
अभियानाचा शुभारंभ पालकमंत्री संजय राठोड यांच्याहस्ते दिग्रस येथे जनजागृती रथाला हिरवा झेंडा दाखवून करण्यात आला. यावेळी जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी संतोष डाबरे, उपविभागीय अधिकारी आशिष बिजवल, दिग्रसचे तहसीलदार मयूर राऊत, कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख शास्त्रज्ञ मयूर ढोले, कृषी उपसंचालक राहुल चव्हाण, कृषी विज्ञान केंद्र सांगवी रेल्वेचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ.नंदकिशोर हिरवे, श्री.चांदुरकर, पुसदचे उपविभागीय कृषी अधिकारी अक्षय गोसावी, दारव्हाचे उपविभागीय कृषी अधिकारी संध्या सावंत, दिग्रसचे तालुका कृषी अधिकारी श्री.राजपूत, इफकोचे जिल्हा प्रतिनिधी संतोष फलटणकर उपस्थित होते.
कृषी विभागाच्या सर्व यंत्रणांनी गावे, वाड्या- वस्त्या येथे जाऊन सर्वसामान्य शेतकऱ्यांना नवनवीन तंत्रज्ञानाचे मार्गदर्शन करावे. त्यांच्या अडचणी समजून घेऊन त्यावर शास्त्रज्ञांनी उपाययोजना सूचविणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री श्री.राठोड यांनी केले. सोबतच चित्ररथाद्वारे शेतकऱ्यांना कृषी विभागाच्या योजनांची माहिती देऊन शेतकऱ्यांचा सहभाग जास्तीत जास्त वाढवावा, असे सांगितले.
कृषी तंत्रज्ञानाच्या गावोगावी जनजागृतीसाठी विकसित कृषी संकल्प अभियान कृषी विज्ञान केंद्र, कृषी विभाग, आत्मा, अक्शन फॉर फूड प्रोडक्शन- अफ्रो व ईफ्को यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येत आहे.
अभियान जिल्ह्यातील २०० गावांमध्ये राबविण्यात येणार आहे. अभियानादरम्यान चर्चा सत्राद्वारे मार्गदर्शन करण्यात येणार आहे. शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणे करिता कृषी विभागाचे अधिकारी, कर्मचारी, दोन्ही कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे शास्त्रज्ञ सहभागी होणार असून शेतकरी, शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपनीचे प्रतिनिधी, तालुक्यात काम करणारे प्रगतीशील शेतकरी, पुरस्कार प्राप्त शेतकरी यांचा सुद्धा सहभाग असणार आहे.
000