आठवडा विशेष टीम―
नांदेड दि. 2 जून : महाराष्ट्र शासनाचा प्रतिनिधी म्हणून सामान्य माणसाची कामे करणे आमची जबाबदारी असून अतिदुर्गम भागातील बंजारा, आदिवासी बहुल भाग असलेला इस्लापूर किनवटकडे अधिक लक्ष देणार असल्याची ग्वाही अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी दिली. हुडी येथील शेतकऱ्यांच्या संवाद कार्यक्रमात ते बोलत होते.
आज किनवट तालुक्यातील इस्लापूर भागात अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांचा दौरा होता. सर्वप्रथम त्यांनी इस्लापूर वनविभागाच्या कार्यालयाला भेट देऊन या ठिकाणी वृक्षारोपण त्यांच्या हस्ते करण्यात आले. नंतर त्यांनी नांदेड जिल्हयातील पर्यटन स्थळ असलेल्या सहस्रकुंड धबधबा येथे महादेवाचे मंदिराचे दर्शन घेऊन धबधबा परिसराची पाहणी केली. यावेळी ट्रस्ट व वाळकी ग्रामपंचायतच्यावतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर इस्लापूर परिसरातील वन्य प्राण्याचे प्रसिद्ध ठिकाण असलेल्या हरण खरबा वरील वन्य प्राण्याची त्यांनी पाहणी केली. त्यानंतर हुडी येथे शेतकऱ्यांशी संवाद साधला.
00000