प्रशासकीयब्रेकिंग न्युज

नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे करून प्रस्ताव तातडीने शासनास सादर करा – मंत्री छगन भुजबळ

आठवडा विशेष टीम―

नाशिक,दि.१५: शेतकऱ्यांना मुबलक प्रमाणात खते व बियाणे उपलब्ध होण्यासाठी सुयोग्य नियोजन करण्यात यावे. तसेच पावसामुळे झालेल्या नुकसानीबाबत तातडीने पंचनामे करून शासनास सादर करावेत, अशा सूचना अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

मंत्री भुजबळ यांनी आज येवला येथील संपर्क कार्यालयात अधिकाऱ्यांसमवेत विविध विकासकामांबाबत तसेच पावसामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेतला. त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी उप विभागीय अधिकारी बाबासाहेब गाढवे, तालुका कृषी अधिकारी शुभम बेरड,निवासी नायब तहसीलदार पंकज नेवसे, येवला शहर पोलिस निरीक्षक धीरज महाजन, तालुका पोलिस निरीक्षक मंडलिक यांच्यासह महावितरण आदी  विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

यावेळी मंत्री भुजबळ म्हणाले की, येवला शहर व तालुक्यातील अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या कांद्यासह अन्य पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पावसामुळे अनेक घरांचेही नुकसान झाले आहे. नुकसान झालेला कुठलाही शेतकरी मदतीपासून वंचित राहता कामा नये, यासाठी जलद गतीने नुकसानीचे पंचनामे पूर्ण करून प्रस्ताव शासनास सादर करावे. वीज पडून तसेच अतिवृष्टीमुळे जीवित हानी व वित्त हानी झालेली असेल त्यांचे पंचनामे करून त्यांना मदत उपलब्ध करून देण्यात यावी, अशा सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.

तालुक्यात शासनाकडून २५० क्विंटल मोफत बियाणाचे उपलब्ध करून देण्यात आले आहे. या बियाणाचे लाभार्थ्यांना योग्य रित्या वाटप करण्यात यावे. शेतकऱ्यांना बियाणे व खतांचा पुरवठा मुबलक प्रमाणात होण्यासाठी सुयोग्य नियोजन करण्यात यावे अशा सूचना मंत्री भुजबळ यांनी बैठकीत दिल्या.

मंत्री भुजबळ म्हणाले की, तालुक्यात काही भागात अद्यापही पाणी टंचाई असून या भागातील नागरिकांना नियमित पाणी पुरवठा करण्यात यावा. या परिसरात १ जुलैनंतर देखील टँकरची आवश्यकता लागल्यास तसा प्रस्ताव पाठविण्यात यावा. येवला शहरातील साठवण तलावात पाणी उपलब्ध करून देण्यात आले असून शहरात नियमित पाणी पुरवठा करण्यात यावा अशा सूचना त्यांनी दिल्या.

पुणेगाव – दरसवाडी – डोंगरगाव कालव्याच्या अस्तरीकरण कामाचा आढावा

पुणेगाव दरसवाडी डोंगरगाव पोहोच कालव्याचे टप्पा १ व टप्पा २ अंतर्गत अस्तरीकरण करण्यात येत आहे. या कामाचा आढावा घेतला. अस्तरीकरणाचे  काम लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावे. आवश्यक तेथे पोलीस सुरक्षा पोलीस विभागाने उपलब्ध करून द्यावी, अशा सूचना मंत्री भुजबळ यांनी संबंधित अधिकाऱ्यांना केल्या. यावेळी अस्तिरीकरणाचे राहिलेले टप्पा १ मधील काम जूनअखेर पूर्ण करण्यात येईल, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

येवला शहर व तालुक्यातील कायदा व सुव्यवस्थेचा आढावा

येवला शहर व तालुक्यात चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहे. या तक्रारींची दखल घेऊन सुरक्षेबाबत पोलिसांनी पेट्रोलिंग करून बंदोबस्त ठेऊन नियोजन करावे. कायदा व सुव्यवस्था राखण्यात यावी. येवला शहरात निर्माण करण्यात आलेल्या पोलीस चौकीमध्ये स्वतंत्र पोलिसाची नेमणूक करण्यात यावी. येवला शहरातील विंचूर चौफुली परिसरात वाहतूक कोंडी टाळण्यासाठी योग्य त्या उपाययोजना करण्यात याव्यात अशा सूचना मंत्री भुजबळ यांनी पोलीस अधिकाऱ्यांना केल्या.

०००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Back to top button