प्रशासकीयब्रेकिंग न्युज

पंढरपूर आषाढी वारीतील अन्न व पेयपदार्थांच्या सुरक्षिततेसाठी अन्न व औषध प्रशासन विभाग सजग व सज्ज – मंत्री नरहरी झिरवाळ

आठवडा विशेष टीम―

मुंबई, दि. २४ :- पंढरपूर आषाढी एकादशी निमित्त लाखो वारकरी पंढरपूरकडे पायी प्रस्थान करत असतात. वारी मार्गावर आणि पंढरपूर व परिसरात वारकऱ्यांना वाटप होणारे अन्न व पेयपदार्थ आरोग्यदृष्ट्या सुरक्षित, स्वच्छ व गुणवत्तापूर्ण राहावेत यासाठी अन्न व औषध प्रशासन सजग व सज्ज झाला असून अन्न व पाण्याच्या सुरक्षिततेसाठी अन्न व औषध प्रशासनाने  प्रभावी योजना आखल्या आहेत, अशी माहिती अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी दिली.

अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ म्हणाले, आषाढी वारी मार्गावर सेवाभावी संस्था, स्वयंसेवक आणि दानशूर मंडळी मोठ्या प्रमाणावर मोफत अन्न व पाण्याचे वाटप करतात. मात्र, खुले अन्न, तात्पुरत्या ठिकाणी तयार होणारे पदार्थ, वातावरणीय बदल व स्वच्छतेचा अभाव यामुळे अन्न विषबाधा किंवा इतर अन्नजन्य आजारांचा धोका निर्माण होऊ नये यासाठी प्रभावी उपाययोजना राबविण्याचे निर्देश अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.

आषाढी वारी मार्गावरील तसेच पंढरपूर व आजूबाजूच्या परिसरातील उपहारगृहे, मिठाई उत्पादक व अन्न विक्री आस्थापनांची काटेकोर तपासणी करण्यात येत आहे. पालख्या, मुक्कामस्थळ, वाटप केंद्र, मंडप व भंडारा स्थळांवर भेटी देऊन अन्न सुरक्षा व स्वच्छता मार्गदर्शक तत्वांचे पालन केले जात आहे की नाही, याची पडताळणी करण्यात येत आहे.

अन्न वाटप करणाऱ्या संस्थांकडे भारतीय अन्न सुरक्षा आणि मानके प्राधिकरण (FSSAI) नोंदणी अथवा परवाना आहे की नाही याची खात्री करून घेणे व नोंदणी नसल्यास तातडीने तात्पुरती नोंदणी मिळविण्यासाठी सहकार्य करणे. अन्न तयार करणाऱ्या ठिकाणी भारतीय अन्न सुरक्षा आणि मानके प्राधिकरणच्या (FSSAI) Schedule ४ अंतर्गत असलेल्या स्वच्छते संदर्भातील तरतुदींचे पालन होत आहे की नाही, याची तपासणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

अन्न वाटप करणारे स्वयंसेवक, संस्था, भंडारा आयोजक यांना लघु प्रशिक्षण दिले जात आहे. “स्वच्छ अन्न सुरक्षित वारी” या घोषवाक्याखाली माहितीपत्रके, पोस्टर्स, बॅनर आदी माध्यमातून जनजागृती केली जात असल्याचे सांगून श्री. झिरवाळ म्हणाले, वारी मार्गावर अन्न सुरक्षा जनजागृती व अन्न तपासणीसाठी ‘Food Safety on Wheels’ वाहनांचा प्रभावी वापर केला जात आहे. दूषित अन्न किंवा पाणी टाळावे याबाबत वारकऱ्यांमध्येही जागरूकता निर्माण केली जात आहे. सडलेले, घाणीत तयार झालेले अन्न आढळल्यास त्वरित नमुने घेऊन प्रयोगशाळेत पाठविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच अन्नजन्य आजार आढळल्यास तत्काळ आरोग्य विभागाशी संपर्क साधून कार्यवाही केली जाईल व जिल्हास्तरीय यंत्रणांशी सतत समन्वय ठेवण्यात येईल.

आषाढी वारी स्वच्छ, सुरक्षित व आरोग्यपूर्ण होण्यासाठी अन्न व औषध प्रशासनामार्फत उचललेले हे पाऊल निश्चितच महत्त्वपूर्ण ठरेल, असा विश्वासही अन्न व औषध प्रशासन मंत्री श्री. झिरवाळ यांनी व्यक्त केला.

००००

एकनाथ पोवार/विसंअ/

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Back to top button