जय जवान आजी माजी सैनिक वसाहतीत अंधाराचे साम्राज्य
अंबाजोगाई:आठवडा विशेष टीम― येथील गट नंबर 591(फौजी निगराणी तामीरात) या जमिनीमधील सैनिकांच्या 229 परिवारांना वीज पुरवठा व घरगुती मीटर जोडणी मिळत नसल्याने सीमेवर असलेल्या सैनिकांशी त्यांच्या कुटुंबियांना मोबाईल चार्जिंग नसल्याने संपर्कच साधता येत नाही.यामुळे सीमेवरील सैनिकांचे काळजीने परिवार चिंतेत आहेत.याबाबत तात्काळ विद्युत पुरवठा व घरगुती मीटर मिळावे अशी मागणी जय जवान आजी माजी सैनिक संस्थेचे अध्यक्ष कॅप्टन पांडुरंग शेप यांनी राज्याचे सामाजिक न्यायमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना.धनंजयजी मुंडे यांचेकडे शुक्रवार,दिनांक 3 जुलै रोजी दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.
जय जवान आजी माजी सैनिक संस्थेच्या वतीने विद्युत पुरवठा व घरगुती मीटर मिळण्यासंदर्भात दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, अंबाजोगाई येथील गट नंबर-591(फौजी निगराणी तामीरात) या जमिनी मधील सैनिकांच्या 229 परिवारांना वीज पुरवठा व घरगुती मीटर मिळणेबाबत एमएसईबी कार्यालयाकडे सन 2018 मध्ये 1.3 टक्क्यांच्या स्कीम मधून मंजुरी मिळाली. त्याप्रमाणे एमएसईबीने दिलेल्या रीतसर वर्कऑर्डर प्रमाणे संस्थेने हे काम स्वतःच्या पैशाने तब्बल साडेबारा लाख रूपये खर्चून पूर्ण केले.या कामाचा वर्क कंप्लेशन रिपोर्ट सादर करून लेखी कळविले.सदर कामाचा सुपरव्हिजन चार्ज राज्य शासनाला 16 हजार 830/- रूपये इतका भरणा केलेला आहे.एमएसईबीच्या नियमानुसार वीज मीटर मिळणेसाठी 88 जणांचे ऑनलाईन अर्ज ही दिनांक 18 नोव्हेंबर 2019 रोजी उपकार्यकारी अभियंता,अंबाजोगाई यांचेकडे सादर केलेले आहेत.सर्व प्रक्रिया नियमानुसार पूर्ण करून ही विद्युत पुरवठा मिळत नाही. आतापर्यंत या वसाहतीत वीज पुरवठा करणा-या पुर्वीच्या वाहिनीवर एमएसईबीच्या परवानगीने सिंगल फेज वीज पुरवठा सुरू होता.तो 29 जून 2020 रोजी बंद करण्यात आला.याबाबत विचारणा करण्यात आली असता एमएसईबी कार्यालयाच्या अधिका-यांनी सांगितले की,जिल्हाधिकारी बीड यांनी आदेश दिल्याने सदर वीज पुरवठा बंद केला आहे.या संस्थेच्या अनेक कुटुंबातील सैनिक हे सध्या अतिदुर्गम अशा काश्मीर सीमा,नौशेरा सेक्टर,पुलवामा,लेह लद्दाख,चीन सीमेवरील चिशुल,खुनी नाला,गलवान घाटी या ठिकाणी देशाचे रक्षणार्थ आपले कर्तव्य बजावत आहेत तर इकडे या सैनिकांचे कुटुंबीय मात्र अंधाराचा सामना करीत आहेत.वीज पुरवठाच नसल्याने मोबाईल चार्जिंगच होत नाही.त्यामुळे सीमेवरील सैनिकांशी अंबाजोगाईतील कुटुंबांना संपर्कच साधता येत नाही.यामुळे सीमेवरील सैनिकांच्या काळजीने परिवार चिंतेत आहेत.तसेच सैनिकांच्या मुलांचे ऑनलाईन शिक्षणही यामुळे खंडीत झाले आहे व त्यांचे ही नुकसान होत आहे असे निवेदनात नमूद केले आहे.
वीज देण्यास न्यायालयाने मनाई केलेली नाही
जय जवान आजी माजी सैनिक संस्थेने यापूर्वी मा.अंबाजोगाई न्यायालयात सदरील गट नंबर-591(फौजी निगराणी तामीरात) या जागेसंबंधी ‘स्टे मिळणे बाबत’ अर्ज दाखल केला होता.त्यावेळी विद्युत पुरवठा या बाबतचा मुद्दा पण,मा.न्यायालयात दाखल केलेल्या अर्जात होता.परंतु,मा.न्यायालयाने त्यांच्या अधिकारात हा निर्णय घेता येत नसल्यामुळे त्यांनी आमचा अर्ज फेटाळला पुढील न्यायासाठी मा.उच्च न्यायालय,औरंगाबाद येथे अपील करता येईल असे मा.न्यायालयाने नमूद केलेले आहे.बहूदा याच मुद्यावर एमएसईबी वीज देत नाही.ही मा.न्यायालयाने दिलेली ही ऑर्डर आम्हाला पण, मिळाली आहे.एमएसईबीला आम्हाला वीज देण्यासाठी मा.न्यायालयाने कुठलीही मनाई केलेली नाही.तरी एमएसईबीने याप्रश्नी सहानुभूतीपूर्वक विचार करून आमचा विद्युत पुरवठा सुरळीत व नियमित करावा.
-कॅप्टन पांडुरंग शेप (अध्यक्ष,जय जवान आजी माजी सैनिक संस्था.)