उपविभागीय कार्यालयासमोर शेकडो बेघर मजुरांचे बेमुदत धरणे आंदोलन
अंबाजोगाई (प्रतिनिधी) :शहर व परिसरात राहणारा शिकलकरी समाज व वंचित घटकातील गोर-गरीब लोक यांना अंबाजेागाई येथील सरकारी जमिनीवर स्थलांतरीत करून कायमचे घर देण्यात यावे,जॉब कार्ड,मजुरांना काम द्यावे व अन्न सुरक्षा देण्यात यावी या व इतर मागण्यांसाठी जातीअंत संघर्ष समिती, अंबाजोगाई प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा करीत आहे. विविध निवेदने,अर्ज, विनंत्या,मोर्चा काढुनही या प्रश्नी न्याय मिळत नसल्याने अखेर कॉ.बब्रुवाहन पोटभरे यांच्या नेतृत्वाखाली शिकलकरी समाज व वंचित घटकातील शेकडो गोर-गरीब,मजुर लोक हे बुधवार,दि. 27 फेब्रुवारी रोजी उपविभागीय कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन करीत आहेत.
या बाबतची माहिती अशी की,शासकीय जमीनीवर बेघरांना शासकीय ‘सर्वांसाठी घरे‘ योजनेतून घरे मिळावीत तसेच त्यांना जॉबकार्ड मिळावे, मजुरांना काम द्या,अन्न सुरक्षा योजनेत या बेघर व वंचित कुटुंबांचा समावेश करून त्यांना शिधापत्रिका मिळाव्यात व स्वस्त धान्य मिळाव्यात या मागण्यांसंदर्भात जातीअंत संघर्ष समिती सातत्याने प्रशासनाकडे पाठपुरावा करीत आहे. विविध प्रकारे हे प्रश्न सोडून घेण्यासाठी कॉ.बब्रुवाहन पोटभरे हे प्रयत्न करीत आहेत. परंतु प्रशासन या बाबत उदासीन दिसत असल्याने अखेर पोटभरे यांनी बेमुदत धरणे आंदोलनाचा इशारा 18 फेब्रुवारी रोजी दिलेल्या निवेदनाद्वारे प्रशासनास दिला होता.या बाबत त्यांनी उपविभागीय अधिकारी, तहसीलदार व पोलिस प्रशासन यांना कळविले होते.त्यानुसार आज बुधवार,दि.27 फेब्रुवारी रोजी शिकलकरी समाज व वंचित घटकातील शेकडो स्त्री-पुरूष, वयोवृद्ध नागरिक व लहान मुले,गोर-गरीब लोक हे रणरणत्या उन्हात बेमुदत धरणे आंदोलनास बसले आहेत.तरी या प्रश्नी प्रशासनाने या लोकांना तात्काळ न्याय द्यावा अन्यथा या पेक्षाही तिव्र आंदोलन करण्यात येईल व झालेल्या परिणामांना शासन व प्रशासन जबाबदार राहिल असा इशारा कॉ.बब्रुवाहन पोटभरे यांनी दिला आहे.
कॉ.बब्रुवाहन पोटभरे यांच्या नेतृत्वाखाली उपविभागीय कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन स्थळी पुनमसिंग टाक, गोरखसिंग भोंड, हिंमतसिंग जुन्नी, विरसिंग टाक,अशोक ढवारे,आशाबाई जोगदंड,छायाबाई तरकसे,विशाल शिंदे, अनिल ओव्हाळ,मिरा जोगदंड,छाया गायकवाड,अलका जोगदंड,रत्नमाला परदेशी या सहीत सार्वजनिक बांधकाम विभाग परिसरातील शिकलकरी समाज, मिलींदनगर व येल्डा रोड परिसरातील शेकडो बेघर कुटुंबे,वंचित समाज बांधव हे बेमुदत धरणे आंदोलनास बसले आहेत.