“अपघातातील चार महिला सहा पुरुष मदतीपासून दूर”
पाटोदा दि.०७:दत्ता हुले― ऑक्टोबर २०१९ मध्ये राज्यातील आठ ते दहा लाख इतक्या संख्येने असंघटित असलेल्या राज्यातील ऊसतोडणी मजुरांच्या कल्याणासाठी लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या नावाने सामाजिक सुरक्षा योजना महायुतीच्या काळात सुरु करत राज्य शासनाने वीस कोटी रुपयांची भरीव तरतुद केली होती.पाटोदा तालुक्यातून दरवर्षी १ लाखांवर नागरिक हे ऊसतोडणीसाठी पश्चिम महाराष्ट्र व कर्नाटकात जातात, त्यांना ऊसतोडणीच्या काळात अनेक संकटांना तोंड द्यावे लागते अशात काही मजुरांना रोडवरील अपघात,विषबाधा विजेचा शॉक,कॅनॉलमध्ये पडून मृत्यू होणे अशा घटना वारंवार घडत असतात, काही वर्षापूर्वी या ऊसतोड कामगारांना विमा संरक्षण देण्यासाठी “विठ्ठलराव विखे पाटील कामगार अपघात विमा योजना”कार्यान्वित होती परंतू काही काळानंतर ती बंद पडली यानंतर बराच काळ मजुरांना विमा देणारी कुठलीही योजना नव्हती, त्यांनतर २०१९ ला राज्य सरकारने स्व. लोकनेते गोपीनाथ मुंडे कामगार सुरक्षा योजना सुरू करून
या योजनेत आठ लाख ऊसतोड कामगारांना सामाजिक सुरक्षा प्रदान केली जाणार होती मोफत घरकुल, मोफत विमा संरक्षण, पाल्यांसाठी वसतिगृहे, शिष्यवृत्ती , कौशल्य विकास आदी सुविधा प्रदान केल्या जाणार होत्या. ऊसतोडणी मजुरांना व त्यांच्या कुटुंबियांसह बैलजोडीला अनेकदा अपघात व आरोग्यासंबंधी समस्यांना सामोरं जावं लागतं. ऊसतोडणी मजुरांच्या स्थलांतरांमुळे वृद्ध आई वडिल आणि बालकांच्याही शिक्षण, आरोग्य आदी समस्या ऊद्भवतात. त्यांनाही या योजनेअंतर्गत शिष्यवृत्ती, वसतिगृहे , कौशल्यविकास आदींसाठी या योजनेतुन आर्थिक तरतुद केली जाणार होती,पण तसे झाले नाही.गळीत हंगाम २०१९-२० या काळात पाटोदा तालुक्यातील अनेक गावातील ऊसतोड कामगारांचे साखर कारखान्यावर काम करत असताना अपघात घडले,पण अद्यापही या कामगारांना शासकीय मदत,सुरक्षा विमा अथवा आर्थिक मदत मिळाली नाही, यामध्ये पाटोदा तालुक्यातील ढाळेवाडी गावातील कामगारांचा डिसेंबर महिन्यात विठ्ठराव शिंदे सहकारी साखर कारखाना लि. गंगाईनगर ता.माढा जि. सोलापूर येथे अपघात झाला त्यामध्ये सौ. अर्चना लक्ष्मण जगदाळे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला व अन्य चार कामगार फ्रॅक्चर व गंभीर जखमी झाले होते, त्यांनतर सोनहीरा साखर कारखाना लि.सोनहीरा ता.केडगाव पलूस जि.सांगली येथे तालुक्यातील गीतेवडी येथील महिला कामगार सौ. महानंदा चंद्रकांत सानप यांच्या मोकळ्या टायर गाडीची पलटी होऊन त्यांच्या कमरेत लोखंडी आंग्ल घुसून त्यांची कंबर फ्रॅक्चर झाली होती, त्यांनतर मार्च महिन्यात गंडाळवाडी येथील ऊसतोडणी कामगार भीमाशंकर साखर कारखाना आंबेगाव ता.जुन्नर जि.पुणे येथे ऊसतोडणी करत असताना कारखाना परिसरात बैलगाडी खाली करण्यासाठी थांबले असता रात्री बैलगाड्या सोडून बाजूला सर्वजण झोपले असताना अचानक झोपेमध्ये असताना भरलेल्या बैलगाडीचे चाक आबासाहेब आरेकर, श्रीहरी पोकळे,कल्याण पवार या तीन कामगारांच्या पायावरून गेल्याने तिघांचे त्यांचे पाय गुडघ्यापासून खाली फ्रॅक्चर झाले होते.या अपघाताच्या घटना घडल्यानंतर संबंधित साखर कारखान्यांनी या घटनेचे पंचनामे करून घेतले होते व दरवर्षी हे साखर कारखाने मजुरांचे विमे भरण्यासाठी यांच्या कामातून ३०० ते ४०० रुपये प्रति कामगार कपात करत असता,अनेक साखर कारखान्याचे गळीत हंगाम २०२०-२१ चे करार सुरू झाले आहेत पण अद्याप या अपघाती मजुरांच्या विम्याबाबत कारखान्यांनी ठोस उपाययोजना केल्या नाहीत, तसेच राज्य सरकारच्या स्व. गोपीनाथ मुंडे कामगार सुरक्षा योजनेचा अद्याप आर्थिक तरतूद नसल्याने एकही कामगारांना विमा संरक्षण मिळाले नाही ही खेदाची बाब आहे.तालुक्यातील या तीनही गावातील कामगारांच्या घरची आर्थिक परिस्थिती बेताची आहे,यामुळे या ऊसतोड कामगारांच्या कुटुंबाला प्रशासन, लोकप्रतिनिधी, अथवा सुरक्षा योजनेची मदत मिळणे आवश्यक होते पण या घटनेनंतर वेळोवेळी पाठपुरावा न केल्याने अथवा स्थानिक लोकप्रतिनिधी व कामगार नेत्यांनी याकडे दुर्लक्ष केल्यामुळे साखर कारखाना पाहिजे तेवड्या दक्षतेने मजुरांचा विमा देण्यासाठी हात पुढे करत नाहीत, त्यामुळे स्थानिक लोकप्रतिनिधी यांनी तालुक्यातील ऊसतोड कामगारांच्या समस्या व वाढते स्थलांतर व मुलांच्याशिक्षणाची गैरसोय याकडे प्रामुख्याने लक्ष देण्याची गरज आहे असे तालुक्यातील ऊसतोड मजुर पुत्र दत्ता हुले याने माध्यमातून खेद व्यक्त करत मजुरांना आर्थिक मदत मिळण्यासाठी सर्वांनी सजग राहण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे.
भरीव निधीसाठी लवकरच पालकमंत्री मोहदयांची भेट घेऊन पाठवुराव करणार आहे. ― दत्ता हुले (ऊसतोड मजुर पुत्र पाटोदा)