गोपीनाथ मुंडेंच्या अकाली अन दुर्दैवी मृत्यूनंतर मुख्यमंत्री पदाची माळ अपघाताने देवेंद्र फडणवीस यांच्या गळ्यात पडली अन ते महाराष्ट्रातले दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री झाले असं म्हणावं लागेल.
मुंडे असते तर ते मुख्यमंत्री अन फडणवीस फार-फार तर अर्थ, उच्चशिक्षण किंवा गृहनिर्माण मंत्री राहिले असते. या पूर्वी साधा राज्यमंत्री पदाचा ही अनुभव नसताना फडणवीस हे राज्यातले दुसरे सर्वात जास्त काळ टिकणारे अन बऱ्यापैकी स्थिर असणारे मुख्यमंत्री ठरले.
सुरुवातीलाच मुख्यमंत्री बनण्याची इच्छा असणारे भाजपचे वरिष्ठ नेते अन मंत्री राहिलेले एकनाथ खडसे यांनी जाहीर व्यक्त केलेली नाराजी, पक्षातल्या मास लीडर पंकजा मुंडे यांच्यासह रावसाहेब दानवे, विनोद तावडे, कदाचीत नितीन गडकरी आदी नेत्यांच्या शर्यतीतून फडणवीस हे मुख्यमंत्री पद खेचुन आणण्यात यशस्वी झाले किंवा ते त्यांच्या सारासार बाजू पाहून त्यांना मिळाले.
अन पाच वर्षाच्या जवळपास राज्य व्यवस्थित चालवण्यास ते यशस्वी ही झाले. लोकांच्या जीवनात काही एकदमच आमूलाग्र बदल घडेल असे काही निर्णय झाले नसले तरी अनेक संकटावर मात करीत जे आहे ते व्यवस्थित सांभाळण्यात फडणवीस यशस्वी झाले म्हणायला हरकत नाही.
त्यांच्या कार्यकाळात सर्वात जास्त मोर्चे निघाले, लाखोंच्या संख्येने लोकं रस्त्यावर उतरली पण त्यांनी सर्व परिस्थिती संयमाने हाताळत कुठलेही चुकीचं स्टेटमेंट केलं नाही किंवा वातावरण चिघळणार नाही याचीही ही काळजी घेतली म्हणावी लागेल.
शिवसेने सोबतच, विरोधी पक्षाला व पक्षातील विरोधकांना शांत करण्यात ते यशस्वी झाले म्हणावे लागेल.
मवाळ असलेले फडणवीस हे जिथं गरज लागेल तिथं आक्रमक, जहाल होण्यात ही मागे सरले नाही.
पूर्ण बहुमत नसतानाही महाराष्ट्रासारखं प्रगत, विचारशील राज्य जवळपास पाच वर्षे सांभाळणे अन विशेष म्हणजे पुन्हा मुख्यमंत्री पदाच्या रेसमध्ये वरच्या क्रमांकावर असणे साधी गोष्ट नक्कीच नाही.
शिवाय त्यांचं नाव हे भावी पंतप्रधान, भावी परराष्ट्रमंत्री म्हणून ही अधून-मधून चर्चेत येत आहे हे सुध्दा उल्लेखनीय आहे.