दिल्ली येथे राष्ट्रपती रामनाथजी कोविंद यांच्या उपस्थितीत राष्ट्रिय पुरस्काराचे वितरण
अंबाजोगाई (प्रतिनिधी): अंबाजोगाई नगर परिषदेला केंद्र सरकारच्या वतीने स्वच्छ भारत अभियान- 2019 अंतर्गत “नाविण्यपुर्ण व उत्कृष्ट उपक्रम राबविल्याबद्दल पश्चिम विभागातील 5 राज्यातून अंबाजोगाई नगरपालिकेला राष्ट्रियस्तरावरील प्रथम क्रमांकाचा पुरस्कार” प्राप्त झाला आहे. बुधवार,दि.6 मार्च रोजी विज्ञानभवन,नवी दिल्ली येथे एका विशेष समारंभात देशाचे राष्ट्रपती रामनाथजी कोविंद यांच्या प्रमुख उपस्थितीत व केंद्रिय नगरविकास व गृहनिर्माण विभागाचे सचिव दुर्गाशंकर मिश्रा यांच्या हस्ते पुरस्कार अंबाजोगाई पालिकेस प्रदान करण्यात आला.
अंबाजोगाई नगर परिषदेच्या वतीने सदरील पुरस्कार हा माजी नगराध्यक्ष राजकिशोर मोदी,उपनगराध्यक्ष सारंग पुजारी,मुख्याधिकारी डॉ.सुधाकर जगताप, नगरसेवक मनोज लखेरा,नगरसेवक तथा भाजपाचे गटनेते दिलीपराव काळे, नगरसेवक कमलाकर कोपले,नगरसेवक संजय गंभिरे,स्वच्छता निरिक्षक अनंत वेडे, नोडल ऑफिसर अजय कस्तुरे यांनी स्विकारला. पुरस्काराचे स्वरूप प्रमाणपञ असे आहे.
पश्चिम विभागातील 50 हजार ते एक लाख लोकसंख्या असणा-या 5 राज्यांतील नगरपालिकांमधून अंबाजोगाई नगरपालिका ही प्रथम आली आहे. पश्चिम विभागात महाराष्ट्र, गोवा, गुजरात, मध्यप्रदेश, हिमाचल प्रदेश या 5 प्रमुख राज्यांचा समावेश आहे. हा पुरस्कार एक बहुमान आहे.नगरपालिका स्थापन झाल्यापासून प्रथमच एवढा मोठा पुरस्कार पालिकेस मिळाला आहे. अंबाजोगाई नगरपरीषदेने शहरातील कचर्याचे विलगीकरण, संकलन व ओल्या कचर्यावर प्रक्रिया करण्याचे अनेक प्रकल्प गेल्या 6 ते 7 महिन्यांपासुन हाती घेतले असून विविध स्तरावर त्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यात आली. शहरातील निर्माण होणार्या दैनंदिन 12 टन कचर्याचे वर्गीकरण व संकलन योग्य पद्धतीने करून त्यावर प्रक्रिया करण्यात येत आहे.यामध्ये नगरपालिकेने घर स्तरावर ओल्या कचर्यापासुन गांडुळखत निर्मीती करण्यास नागरिकांना प्रोत्साहित केल्याने अनेक नागरिकांनी स्वतः गांडुळखत निर्मितीस सुरूवात केली आहे.तसेच वॉर्ड स्तरावर 10 ठिकाणी स्वयंसेवी संस्थेच्या मदतीने गांडुळखत निर्मिती प्रकल्प नगरपरिषदेने सुरू केले आहेत.त्यामुळे त्या-त्या वॉर्डात निर्माण होणार्या ओल्या कचर्यावर त्याच वॉर्डात प्रक्रिया केली जात आहे.स्वच्छ भारत अभियानाच्या निधीतून शास्त्रोक्त पद्धतीने कचरा प्रक्रिया केंद्र नगर परिषदेने मांडवा रोड सर्वे नं.17 मध्ये विकसित केलेले आहे. नगरपरिषदेमध्ये जुलै 2018 मध्ये मुख्याधिकारी म्हणून डॉ.सुधाकर जगताप हे आल्यानंतर त्यांनी नगर परिषदेचे पदाधिकारी, अधिकारी,कर्मचारी, स्वच्छता निरिक्षक व सफाई कर्मचारी या सर्वांच्या सहकार्याने टिमवर्कने काम करून अल्पावधीत नगर परिषदेच्या घनकचरा व्यवस्थापनात उल्लेखनिय प्रगती केली आहे.तसेच माजी नगराध्यक्ष राजकिशोर मोदी यांच्या सातत्यपुर्ण पाठपुराव्यामुळे शासनाकडून नगरपालिकेस मोठ्या प्रमाणावर विकास निधी मिळाला आहे.त्यामुळे अंबाजोगाईत विविध विकास कामे ही सध्या प्रगतीपथावर आहेत. काही पुर्ण झाली आहेत.
याच विकास निधीतून शहरातील जिर्ण झालेली शौचालय दुरूस्त करून आवश्यक त्या ठिकाणी नविन शौचालयांची निर्मिती करून नागरिकांची सोय केली आहे.तसेच शहरात 3300 वैयक्तीक शौचालयांची निर्मिती करून नगर परिषद अंबाजोगाई ही औरंगाबाद विभागात अग्रेसर ठरली आहे.या सर्व बाबी एकजुटीने व सर्व घटकांचे सहकार्याने राबविल्याबद्दल नगराध्यक्षा सौ. रचनाताई सुरेश मोदी, उपनगराध्यक्ष सारंग पुजारी,माजी नगराध्यक्ष राजकिशोर मोदी, मुख्याधिकारी डॉ.सुधाकर जगताप, पालिकेचे सर्व सभापती, नगरसेवक,नगरसेविका स्वच्छता निरिक्षक अनंत वेडे,नोडल ऑफिसर अजय कस्तुरे व सर्व टिमचे अनेकस्तरांतून अभिनंदन होत आहे. मराठवाड्यातील केवळ 3 नगर पालिकांचीच केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत अभियानात स्वच्छ सर्वेक्षण अंतर्गत निवड झाली होती.त्यात अंबाजोगाई पालिकेची निवड स्वच्छ सर्वेक्षण या मुख्य स्पर्धेत निवड झाली आहे.या स्पर्धेत देशभरातून एकुण 4500 नगरपरिषदा सहभागी झाल्या होत्या. त्यात मराठवाड्यातील 78 नगरपालिकांनी सहभाग घेतला.त्यापैकी अंबाजोगाई नगरपरिषदेला केंद्र सरकारच्या वतीने स्वच्छ भारत अभियान अंतर्गत “नाविण्यपुर्ण व उत्कृष्ट उपक्रम राबविल्याबद्दल पश्चिम विभागातून स्वच्छ सर्वेक्षण-2019 चा राष्ट्रियस्तरावरील प्रथम क्रमांकाचा पुरस्कार” प्राप्त झाला आहे. गतवर्षी 205 व्या रँकवर असलेल्या अंबाजोगाई नगर पालिकेने यावर्षी सातत्यपुर्ण कामगिरी व अभियान प्रभावीपणे राबवून थेट राष्ट्रीय पुरस्कारालाच गवसणी घातली.यापुर्वीही नगरपरिषदेला संत गाडगेबाबा नागरी स्वच्छता अभियानातर्गंत राज्यात,विभागात व जिल्हास्तरावर सर्व प्रथम,द्वितीय क्रमांकाची अनेक पारितोषिके मिळालेली आहेत.आता थेट राष्ट्रीय पुरस्कारावरच अंबाजोगाईने मोहर उमटविली आहे.
राष्ट्रीय पुरस्काराचे श्रेय सर्व अंबाजोगाईकरांना..!
अंबाजोगाई नगरपरिषदेला केंद्र सरकारच्या वतीने स्वच्छ भारत अभियान अंतर्गत “नाविण्यपुर्ण व उत्कृष्ट उपक्रम राबविल्याबद्दल पश्चिम विभागातून स्वच्छ सर्वेक्षण-2019 चा राष्ट्रियस्तरावरील प्रथम क्रमांकाचा पुरस्कार” प्राप्त झाला त्याचे संपुर्ण
श्रेय सर्व अंबाजोगाईकर,
पालिकेचे स्वच्छता विभागाचे सर्व कर्मचारी, अधिकारी,नगरसेवक व नगरसेविका यांचे आहे.
अंबाजोगाईकरांनी सतत नगरपालिकेला सहकार्य करण्याची सकारात्मक भूमिका ठेवली आहे. पालिकेच्या विविध उपक्रमात तमाम अंबाजोगाईकर नागरिक,विविध सामाजिक व शैक्षणिक संस्था,संघटना व सर्व समाजघटक यांचे अनमोल सहकार्य लाभत आहे.यापुढेही
अंबाजोगाईतील सर्व समाजबांधवांना सोबत घेवून शहरविकासाची प्रक्रिया गतिमान करणार आहोत.-राजकिशोर मोदी,(गटनेते तथा माजी नगराध्यक्ष)