प्रशासकीयब्रेकिंग न्युज

महाराष्ट्रातील दोन साहित्यिकांचा प्रतिष्ठित साहित्य अकादमी पुरस्काराने सन्मान

आठवडा विशेष टीम―

नवी दिल्ली, दि. 8: मराठीतील ज्येष्ठ समीक्षक आणि लेखक डॉ. सुधीर रसाळ यांना त्यांच्या समीक्षात्मक ग्रंथ ‘विंदांचे गद्यरूप’ यासाठी तर गुजराती भाषेसाठी दिलीप झवेरी यांना त्यांच्या ‘भगवाननी वातो’ या कवितासंग्रहासाठी प्रतिष्ठित साहित्य अकादमी पुरस्काराने आज सन्मानित करण्यात आले.

येथील कमानी ऑडिटोरियममध्ये ‘ साहित्य अकादमी पुरस्कार 2024 अर्पण’  सोहळ्याचे दिमाखदार आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमास  प्रख्यात नाटककार आणि लेखक महेश दत्तानी प्रमुख पाहुणे म्हणून, तर साहित्य अकादमीचे अध्यक्ष माधव कौशिक, उपाध्यक्ष कुसुम शर्मा, सचिव के. श्रीनिवासराव व्यासपीठावर तसेच विविध भाषेतील साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त मान्यवरांसोबत उपस्थित होते. पुरस्काराच्या स्वरूपात ताम्रपत्र, शाल आणि रुपये एक लाख रोख रक्कम प्रदान केली जाते.

आज झालेल्या पुरस्कार वितरणाच्या कार्यक्रमात 23 प्रादेशिक भाषांमधील नामांकित साहित्यिकांच्या साहित्यकृतींना गौरवण्यात आले.

विंदांचे गद्यरुप या पुस्तकाविषयी 

मराठी साहित्य क्षेत्रातील ज्येष्ठ समीक्षक डॉ.सुधीर रसाळ यांच्या “विंदाचे गद्यरुप” या समीक्षात्मक पुस्तकात प्रख्यात मराठी कवी आणि समीक्षक विंदा करंदीकर यांच्या समीक्षात्मक लेखनावर सविस्तर चर्चा करण्यात आलेली आहे.

ज्येष्ठ समीक्षक आणि लेखक डॉ.सुधीर रसाळ यांच्याविषयी…

डॉ.सुधीर रसाळ हे मराठीतील मान्यवर समीक्षक आणि लेखक आहेत. त्यांनी 1956 पासून मराठी वाङ्मयाची समीक्षा करत उल्लेखनीय योगदान दिले आहे. दिल्लीच्या साहित्य अकादमीमध्ये मराठीचे प्रतिनिधित्व करणारे रसाळ हे औरंगाबाद विद्यापीठाच्या मराठी भाषा व वाङ्मय विभागाचे 1990 ते 1993 या काळात प्रमुख होते. साहित्य लेखन, समीक्षा आणि संपादन या क्षेत्रांत त्यांचा हातखंडा आहे.

कवी, लेखक दिलीप झवेरी लिखित भगवाननी वातो‘  कवितासंग्रहाविषयी

गुजराती भाषेचे ज्येष्ठ कवी लेखक आणि  समीक्षक दिलीप झवेरी यांचा जन्म मुंबईतील असून ते ठाणे येथे स्थायिक झाले आहेत.

‘भगवाननी वातो हा गुजराती भाषेतील  16 पृथक्क गद्य कवितासंग्रह संग्रह असून एकच लांब कविता आहे. या कवितासंग्रहामध्ये ईश्वरा बद्दल जटिल कोलाज मांडलेले असल्याने हा गंभीर केंद्रीय विषय आहे. हा कवितासंग्रह नाजूकपणे रोजच्या बोली भाषेत मांडलेला आहे. या कविता संग्रहामध्ये संपूर्ण ब्रह्मांडाला एकत्रित करण्याचा प्रयत्न आहे यामध्ये राजकीय व्यवस्था, विज्ञान, इतिहास  भूतकाळ आणि वर्तमान का यांचे एकत्रित मिलाफ करून कविता गुंफल्या आहेत.

कोकणी भाषेसाठी लेखक नाटककार समालोचक आणि अनुवादक मुकेश थळी  यांना त्यांच्या ‘रंगतरंग ‘ निबंध संग्रहासाठी आज साहित्य अकादमी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

रंगतरंग या निबंध संग्रहात एकूण 24  वेगवेगळ्या विषयांवर निबंध लिहिलेले आहेत. या निबंधाची भाषा अत्यंत काव्यात्मक सुंदर तथा सहज स्पष्ट आणि आकर्षक अशी आहे. यामध्ये म्हणी, वाक्यप्रचार यांचा उपयोग करण्यात आला असून जी वाचकांना चकित करते.

साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त सर्वच सन्मानित साहित्यिक उद्या साहित्य अकादमी परिसरातील नर्मदा या सभागृहात  सकाळी दहा वाजता त्यांच्या  पुरस्कार प्राप्त साहित्य विषयी संवाद साधतील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Back to top button