पाचोरा: ज्ञानेश्वर धोंडू पाटील― यावर्षीच्या भीषण दुष्काळामुळे पाचोरा तालुक्यातील फळबाग क्षेत्र मोठ्या प्रमाणावर कमी झाले असून पाणीटंचाईमुळे वर्षानुवर्षे मेहनतीनं जगवलेल्या मोसंबी लिंबू डाळिंब तत्सम फळबागा सुकल्या आहेत. अशा परिस्थितीमध्ये काही शेतकऱ्यांनी टॅंकरने पाणीपुरवठा करून फळबागा जगवल्या आहेत. पिंपळगाव राजुरी भोजे शिंदाड वाडी शेवाळे वाणेगाव आदी गावातील काही शेतकऱ्यांनी बागा वाचविण्यासाठी आर्थिक परिस्थिती हालाखीची असताना टँकरणे बागाला पाणी पुरविले आहे. यातील असंख्य शेतकऱ्यांनी पिक विमा काढलेला असून आर्थिक क्षमते अभावी काहींना विम्याचा हप्ता भरता आला नाही .परंतु सर्वत्र भीषण दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर शेतकरी जगविण्यासाठी शासनाने पिक विम्याचा लाभ देणे फळबाग संवर्धनासाठी अनुदान देणे अपेक्षित आहे.
यावर्षी कमी पर्जन्यमानामुळे परिसरातील नदी-नाले तसेच तलाव कोरडेच राहिले होते .पर्यायाने विहिरींना देखील पाणी आले नव्हते. खरीप हंगाम जेमतेम उरकल्यानंतर बहुवार्षिक फळझाडांना जलसिंचन करणे अशक्य झाले होते .विशेष म्हणजे या परिसराला मागील तीन वर्षापासून दुष्काळाच्या झळा सोसाव्या लागत असल्याने शेतकरी वर्ग आर्थिक विवंचनेत आहे.
दुष्काळाने होरपळलेल्या पाचोरा तालुक्यात शेती पिण्याच्या पाण्याची समस्या देखील उग्र रूप धारण करून आहे यामध्ये भरीस भर म्हणून उच्च तापमानामुळे नागरिक हैराण झाले आहेत मात्र अशाही परिस्थितीत शेतकरी वर्ग नाउमेद न होता शेती मशागतीच्या कामाला लागला आहे यावर्षी चांगला पावसाळा होऊन चांगले उत्पन्न येईल या भाबड्या आशेने खरीप हंगामाकडे पहात आहे.
0