मराठा आरक्षणावरील न्यायालयाच्या निर्णयाचे केले स्वागत
मुंबई दि.२७: मराठा समाजाला दिलेला शब्द आम्ही पुर्ण केला असून समाजाला आता ख-या अर्थाने न्याय मिळाला आहे, अशा शब्दांत राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री ना पंकजाताई मुंडे यांनी मराठा आरक्षणावरील न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचे स्वागत केले आहे.
मराठा आरक्षणावरील सर्व याचिकांची आज मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी होऊन न्यायालयाने मराठा आरक्षणावर राज्य सरकारने नेमलेल्या राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल घटनात्मक दृष्टया वैध ठरवत आरक्षणाचा निर्णय कायम ठेवणारा निकाल दिला. न्यायालयाच्या या निकालाचे स्वागत करून यावर प्रतिक्रिया देताना ना पंकजाताई मुंडे पुढे म्हणाल्या की, सरकारने मराठा समाजाला कोर्टात टिकणारे आरक्षण देऊ असा शब्द दिला होता, तसेच परळी येथे झालेल्या आंदोलनाच्या वेळी देखील आम्ही शब्द दिला होता, तो या निकालाने पुर्ण झाला आहे, शिवाय ओबीसी ला धक्का न लावता हे आरक्षण मिळाले आहे. या निकालामुळे मराठा समाजाला शिक्षणात आणि नोकरीत आरक्षण लागू झाले आहे. हा निकाल समाजाला मोठा दिलासा देणारा आहे असे सांगून ना. पंकजाताई मुंडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन केले आहे.