प्रशासकीयब्रेकिंग न्युज

जागतिक पातळीवरील साठवणूक तंत्रज्ञानाचा अभ्यास करून गोदामाची साठवणूक क्षमता वाढवावी – पणनमंत्री जयकुमार रावल

आठवडा विशेष टीम―

पुणे, दि. ९: राज्यात केंद्र सरकारच्या हमीभाव योजनेत नाफेड व एनसीसीएफ यांच्या माध्यमातून मोठ्याप्रमाणात खरेदी केलेला शेतमाल तसेच शेतकऱ्यांच्या शेतमालाची साठवणूकही वखार महामंडळाच्या गोदामात होते, त्यामुळे आवश्यकतेनुसार गोदाम साठवणूक क्षमतेत वाढ करण्याच्यादृष्टीने देशासह जागतिक पातळीवरील साठवणूक तंत्रज्ञानाचा अभ्यास करावा व त्या माध्यमातून तांत्रिकदृष्ट्या अद्यावत साठवणूक तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी नियोजन करावे, असे प्रतिपादन पणनमंत्री जयकुमार रावल यांनी दिले.

पुणे येथे महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाच्या संचालक मंडळासोबत आयोजित बैठकीत ते बोलत होते, यावेळी महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक कौस्तुभ दिवेगावकर, सहव्यवस्थापकीय संचालक दीपक शिंदे यांच्यासह महामंडळाचे अधिकारी उपस्थित होते.

पणन मंत्री श्री. रावल म्हणाले, राज्यात सद्यस्थितीत महामंडळाची उपलब्ध साठवणूक क्षमता ही स्वमालकीची १७.२२ लाख मेट्रिक टन आणि भाडेतत्त्वावरील ७.३३  लाख मेट्रिक टन अशी २४.५५ मेट्रिक टन आहे, येत्या काळात नवीन सुमारे ५२ हजार मेट्रिक टन साठवणूक क्षमतेचे गोदाम निर्मितीसंदर्भात व्यवहार्य नियोजन करावे. राज्यातील गोदामाचे रेटिंग करुन घ्यावे, जेणेकरून केंद्र सरकारच्या सवलतीचा लाभ घेता येईल.

राज्यातील गोदामामध्ये सनियंत्रण तसेच कामकाजात पारदर्शकता राहण्याच्यादृष्टीने सीसीटीव्ही बसवून त्यांचे नियंत्रण कक्ष पुणे येथील वखार महामंडळाच्या कार्यालयात करावे. यामुळे राज्यातील गोदामात उपलब्ध साठवणूक क्षमतेपेक्षा अधिक साठवणूक क्षमता वाढण्यास मदत होईल.

शेतकऱ्यांना साठवणूक भाड्यामध्ये ५० टक्के आणि शेतकरी उत्पादक संस्थांना २५ टक्के सवलत दिली जाते. साठवणूक केलेल्या मालास १०० टक्के विमा संरक्षण तसेच शेतमाल तारण कर्ज उपलब्ध करुन दिले जाते.

धान्य साठवणूकीमुळे बाजारभाव उच्च असतांना शेतकऱ्यांच्या शेतमालाचा चांगला परतावा मिळून त्यांची आर्थिक स्थिती सुधारण्यास मदत होईल. शेतकऱ्यांनी गोदामामध्ये अधिकाधिक धान्य साठवणूक केल्यामुळे शेतकऱ्यांचे अन्न धान्याचे कापणीनंतरचे नुकसान कमी होऊन त्यांच्या शेतमालास चांगला बाजारभाव मिळून त्यांची आर्थिक स्थिती सुधारेल.

शेतकऱ्यांचा शेतीमाल शास्त्रशुध्द पध्दतीने साठविण्यासोबतच कृषी क्षेत्रात अन्नधान्याचा साठा वाढविण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन द्यावे. वखार महामंडळाच्या गोदामामध्ये धान्य ठेवण्यासाठी शेतकऱ्यांचा विश्वास आणि इच्छा वाढविण्यासाठी प्रयत्न करावे, असे श्री रावल म्हणाले.

श्री. दिवेगावकर यांनी महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाची मागील तीन वर्षाची तुलनात्मक आर्थिकस्थिती, साठवून क्षमता व साठवून क्षमता वापर, संस्थानिहाय साठवणूक क्षमता वापर, शेतकऱ्यांसाठी सोई-सुविधा, शेतमाल तारण कर्ज योजना, हमीभाव खेरेदी, साठवणूक नियोजन, गोदाम बांधकाम, प्रस्तावित गोदाम तसेच राज्य शासन, स्मार्ट प्रकल्पाकडे प्रस्तावित प्रकल्पाबाबत माहिती दिली.

जांबरगाव ॲग्रो लॉजिस्टिक पार्कचे मुख्यमंत्र्यांचे हस्ते लवकरच उद्घाटन

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील जांबरगाव येथील ॲग्रो लॉजिस्टिक पार्क निर्माण कार्य जवळजवळ पूर्ण झाले आहे.त्यामध्ये १० हजार मे. टन क्षमतेचे सायलो दोन गोदामे ६ हजार मे.टन, क्लिनिंग व ग्रेडिंग २ युनीट (५ मे.टन /तास क्षमता), पेट्रोल पंप, सामायिक सुविधा केंद्र, उपहारगृह, ट्रक टर्मिनल, अंतर्गत रस्ते इत्यादी कामे पूर्ण झाली आहेत, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लवकरच त्याचे उद्घाटन करण्यात येणार आहे, असेही मंत्री श्री. रावल यांनी सांगितले. त्याच बरोबर लातूर येथील १० हजार मेट्रिक टन क्षमतेचे सायलो निर्माण कार्याचे भूमिपजन करण्यात येणार आहे. असेही मंत्री श्री. रावल म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Back to top button