मुंबई:आठवडा विशेष टीम―परळी शहरातील नागरीकांच्या पिण्याच्या पाण्याची समस्या दूर करण्यासाठी शहराला खडका धरणातून पाणी पुरवठा करावा या राज्याच्या ग्रामविकास आणि महिला व बालविकास मंत्री ना.पंकजाताई मुंडे यांच्या आग्रही मागणीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मकता दर्शविली असुन येत्या १५ दिवसात खडका धरणाचे पाणी शहराला मिळणार आहे. दरम्यान, हे पाणी देण्यासाठी पाईप लाईन जोडण्याचे काम लवकरच सुरू होणार आहे.
यंदा पावसाचे प्रमाण अत्यल्प असल्यामुळे बीड जिल्ह्यात दुष्काळसदृष्य परिस्थिती उद्भवली आहे. परळी शहराला पाणी पुरवठा करणारे वाण धरण अद्यापही कोरडे आहे त्यामुळे आगामी काळात नागरिकांना भीषण पाणी टंचाईला सामोरे जावे लागणार आहे. नागरिकांची पाण्याची समस्या दूर करण्यासाठी ना. पंकजाताई मुंडे यांनी पहिल्यापासूनच पुढाकार घेतला होता, गोदावरी नदीवर असलेल्या खडका धरणातून औष्णिक विद्युत केंद्राला पाणी पुरवठा केला जातो. याच खडका धरणातून परळी शहरालाही पाणी पुरवठा करावा अशी मागणी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सातत्याने लावून धरली. मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या या मागणीचा सकारात्मक विचार केला असुन आगामी पंधरा दिवसात खडका धरणातून शहराला पिण्याच्या पाण्यासाठी पाईप लाईन जोडली जाणार आहे. पाईप लाईन जोडल्यानंतर संबंधित यंत्रणेने शहरातील नागरिकांना सुरळीत पाणी पुरवठा करावा अन्यथा संबंधित यंत्रणेवर कडक कारवाई केली जाईल असे ना.पंकजाताई मुंडे यांनी सांगितले. दरम्यान, त्यांच्या या आग्रही भूमिकेमुळे शहरातील पाण्याची समस्या लवकरच दूर होऊन नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.