अहमदनगर:आठवडा विशेष टीम―दि.१६-१२-२०१९ रोजी राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक (नाबार्ड) आणि महिला आर्थिक विकास महामंडळ अहमदनगर स्थापित ज्ञानेश्वरी लोकसंचलित साधन केंद्र , भेंडा यांच्या संयुक्त विद्यमाने बचत गटातील अध्यक्ष व सचिव यांच्याकरिता घेतलेले नेतृत्व प्रशिक्षण संपन्न झाले. या प्रसंगी नाबार्डचे जिल्हा विकास प्रबंधक मा.श्री. शिलकुमार जगताप सर , जिल्हा अग्रणी बँक अधिकारी मा.श्री. एस.एम.वालावलकर सर , महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम) अहमदनगर जिल्हा समन्वय अधिकारी मा.श्री.संजय गर्जे सर, सहायक जिल्हा समन्वय अधिकारी (माविम अ.नगर) मा.श्री.सुनील पैठणे सर, लेखाधिकारी (माविम अ.नगर) मा.श्री. गजानन ढोणे सर, ज्ञानेश्वरी लोकसंचलीत साधन केंद्र या कार्यालयाच्या सचिव श्रीमती.आरती नायडू , व्यवस्थापक श्री.मयूर कुलकर्णी, लेखापाल श्री.अश्विनकुमार माळी आदि उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात “इतनी शक्ती हमे दे न दाता” या माविम प्रेरणा गीताने झाली. त्यानंतर व्यासपीठावरील उपस्थित सर्व मान्यवर व गटातील प्रमुख महिलांच्या हस्ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे प्रतिमापूजन करण्यात आले.यानंतर मान्यवरांचा कार्यालयाच्या वतीने सत्कार समारंभ करण्यात आला. यानंतर जिल्हा समन्वय अधिकारी माविम संजय गर्जे सर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक सादर केले. यामध्ये त्यांनी माविमच्या जिल्हास्तरीय कामाचा आढावा सादर केला. तसेच कार्यालयाबद्दल माहिती दिली. त्यानंतर उपस्थित मान्यवरांनी महिलांना मार्गदर्शन केले. शिलकुमार जगताप यांनी बचत गटाविषयी योजनांची , JLG, तसेच गट चालवण्याची पंचसूत्री, गट चालवताना घ्यावयाची काळजी याबद्दल महिलांना मार्गदर्शन केले. श्री.वालावलकर यांनी महिलांना बँकेबाबत माहिती दिली तसेच बचत गटांचा बँकेशी व्यवहार कसा पारदर्शक असावा, बँक कर्ज परतफेड , व नियमित बँक भरणा केला पाहिजे इत्यादी विषयी मार्गदर्शन केले. तसेच बँकेकडून कुठल्याही प्रकारे गटाला अडचण आल्यास तक्रारीकरिता संपर्क क्रमांक देखील त्यांनी दिला. त्यांनतर आरती नायडू यांनी उत्कृष्ठ नेतृत्व कसे असावे याबद्दल माहिती दिली.
सदर प्रशिक्षणामध्ये बचत गटाच्या दृष्टीने नेतृत्व म्हणजे काय, उत्तम लीडर चे गुण कोणते, लीडरचे दोष कोणते, नेतृत्व बदल आवश्यक का आहे, नेतृत्वाचे अष्टपैलू घटक या विषयाचे प्रशिक्षण महिलांना देण्यात आले. त्यानंतर सर्व महिलांनी सहभोजनाचा आस्वाद घेतला. त्यानंतर प्रशिक्षणातून महिला काय शिकल्या यावर ३० मिनिटाचे सेशन झाले. तदनंतर आरती नायडू यांनी आभार प्रदर्शन करून प्रशिक्षणाची सांगता केली. २२ गटातील ४४ महिलांनी सदर प्रशिक्षणाचा लाभ घेतला. कार्यक्रमास प्रशिक्षक म्हणून श्री. सुनील पैठणे सर हे होते. कार्यक्रम यशस्वी होण्याकरिता मयूर कुलकर्णी, अश्विनकुमार माळी, संगीता खंडागळे, राणी नरोडे, निर्मला राउत व योगिनी पवार यांनी परिश्रम घेतले.
0