बीड जिल्हामहिला विशेषविशेष बातमीसामाजिक

बीड: पालवन येथे मन हेलावून टाकणारी एक संक्रांत कुंकवा पलीकडची साजरी

विधवा म्हणून हिनवू नका तिचा सन्मान करा – सौ.रेखा क्षीरसागर

बीड:आठवडा विशेष टीम― अलीकडील काळामध्ये व्यसनाधीनता, अपघात आणि नैराश्यातून मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. तारुण्यामध्ये मृत्यूमुखी पडल्यामुळे अगदी कमी वयात महिलांवर विधवा होण्याचे संकट ओढवत आहे. यामध्ये त्या स्त्रीचा कोणताही दोष नसतो. मात्र एक बाईच दुसऱ्या एका बाईचा रूढी परंपरेच्या नावाखाली अनाहूतपणे अवहेलना करून तिच्या मानसिकतेशी खेळत आहे.तिला विधवा म्हणून हे हिनवण्यापेक्षा तिचा सन्मान करावा. शिक्षिका मनीषा जायभाये यांनी मकर संक्रांतीच्या दिवशी विधवा महिलांना साडी-चोळी भेट देण्याचा सुरू केलेला उपक्रम आधुनिक युगातील एक क्रांतिकारी निर्णय आहे. या निर्णयाला भविष्यात आमदार संदीपभैया आणि जिल्हा परिषदेच्या माध्यमातून अधिक उभारी देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करेल असा विश्वास जिल्हा परिषद सदस्या रेखा क्षीरसागर यांनी व्यक्त केला.
बीड पासुन जवळच असलेल्या पालवण येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये सहशिक्षिका मनीषा जायभाये यांच्या संकल्पनेतून एक संक्रांत कुंकवा पलीकडची या उपक्रमातून विधवा महिलांना साडीचोळी वाटपाचा कार्यक्रम 14 जानेवारी रोजी सायंकाळी ७ वाजता मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गावच्या सरपंच नयनताई पवार लाभल्या तर प्रमुख अतिथी म्हणून व्यासपीठावर जिल्हा परिषद सदस्या सौ रेखाताई क्षीरसागर, मा नगरसेविका जयश्रीताई विधाते,सत्यभामा ताई बांगर, हर्बल ग्रुपचे अंबादास इंगळे, अर्जून सुसे, सपना सुसे, डॉ. नेहरकर, किरण कानडे, दादासाहेब शेळके, दीपक नरवडे, आश्रुबा खेडकर, केंद्रीय मुख्याध्यापिका लाहोर मॅडम, महाराष्ट्र शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष निर्मळ अंकुश, पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष वैभव स्वामी आदी मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये हा अविस्मरणीय आणि क्रांतिकारी सोहळा पार पडला. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकामध्ये कार्यक्रमाच्या संयोजिका मनीषा जायभाये यांनी स्वतःच्या आनंदी जीवनावर पतीच्या अपघातामुळे दुःखाचा कोसळलेला डोंगर जेव्हा शब्दात व्यक्त केला तेव्हा व्यासपीठासह समोरील समदुःखी महिला आणि श्रोते गंन स्तब्ध झाले. प्रत्येकाच्या डोळ्यात अश्रू तरारले. मनिषा ताई यांनी आपल्या दुःखाच्या भावनांना वाट मोकळी करून देत समाजाला आव्हान केले की, एक महिला हिच दुसऱ्या महिलेचे दुःख समजून घेऊ शकते. मात्र दुर्दैवाने पतीच्या निधनानंतर पुरुष नव्हे तर महिलाच तिच्या दुःखामध्ये भर टाकण्याचे काम नकळतपणे करते. पतीने प्रेमाने लावलेले कुंकू, घातलेले मंगळसूत्र, पायातील जोडवे आदी आभूषणे उतरवली जातात. ही प्रथा त्या स्त्रीला सतत अग्नीडाग देणारी आहे. तिचा दोष नसताना तिच्यावर जिवंतपणे वाईट नजरेने पाहणे, तिला जगणे असह्य करणारे ठरते. ती विधवा झाली म्हणजे त्यात तिचा दोष आहे हा गैरसमज दूर करून तिला सन्मानाने जगू देण्यासाठी आता महिलांनीच पुढे येण्याची गरज आहे. या बदलासाठी मकर संक्रांतीच्या दिवशी विधवा महिलांना साडीचोळी देऊन तिचा सन्मान करण्याचा प्रयत्न मागील तीन वर्षापासून सुरू केला आहे. या उपक्रमाला समाज मान्यता मिळण्याची गरज असल्याची भावना व्यक्त केली. याप्रसंगी प्रतिभा आरसूळ यांनी मनोगत व्यक्त करताना आपल्या दुःखांच्या भावनांना शब्दात व्यक्त करून समाजाने आता विधवा महिलांना सन्मान पूर्वक समाजात वागू देण्यासाठी पुढाकार घेणे गरजेचे आहे.असे मत व्यक्त केले. याप्रसंगी डॉ. निलेश डुमणे, शिक्षक संघटनेचे अंकुश निर्मळ, अंबादास इंगळे आदी मान्यवरांनी मनीषा ताईंच्या उपक्रमाचे कौतुक करून या उपक्रमाला भविष्यात आणखीन बळ देण्याचे अभिवचन दिले. सत्यभामाताई बांगर यांनी ग्रामीण भाषेत या अन्यायग्रस्त रुढी परंपरेवर ताशेरे ओढून कान टोचले.मानव निर्मित अशा चुकीच्या पद्धती बंद करण्यासाठी मनिषाताई ने उचललेली पावले क्रांतिकारी असल्याचे मत व्यक्त केले.भविष्यात व्यसनमुक्तीची चळवळ उभी करावी या चळवळीला माझा पूर्णतः पाठिंबा राहील असे जाहीर केले. तर नगरसेविका जयश्री ताई विधाते म्हणाल्या की,विधवा महिलांना सन्मान ही काळाची गरज आहे हे मनीषाताईंनी या उपक्रमातून सिद्ध केले. या सन्मानाची सुरुवात मी माझ्या घरापासून करणार आहे असे मत व्यक्त करून त्यांनी या कार्यक्रमाच्या संयोजिका मनीषाताई जायभाये यांचा व्यासपीठावर जाहीर सत्कार करून त्यांच्या या स्तुत्य उपक्रमाला शुभेच्छा दिल्या. डॉ. नेहरकर यांनी या क्रांतिकारी विचारांचे रोपटे राज्यभर निर्माण होऊन विधवा महिलांना सन्मानाचे आणि हक्काचे हे व्यासपीठ व्हावे अशी अपेक्षा व्यक्त केली. तर पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष वैभव स्वामी म्हणाले की, जोपर्यंत निंदकाचे घर हे शेजारी नव्हे तर रक्तातले, जवळचे, घरातले असलेले निंदक जोपर्यंत बदलणार नाहीत तोपर्यंत विधवा महिलांकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलणार नाही. तेव्हा प्रत्येकाने स्वतःपासून बदल करावा आणि विधवा महिलांना देखील सन्मान द्यावा. यासाठी अशा उपक्रमांना लेखणीचे बळ आणि प्रत्यक्ष सहकार्य करण्याची हमी दिले. पुढे बोलताना रेखाताई क्षीरसागर म्हणाल्या की, पश्चिम महाराष्ट्रात फुटा फुटा वर दुधाच्या डेअरी आहेत. आपल्या जिल्ह्यात मात्र फुटाफुटा वर दारूची दुकाने आहेत. जोपर्यंत व्यसन मुक्त जिल्हा आणि महाराष्ट्र होणार नाही तोपर्यंत महिलांवर येणारे संकट कमी होणार नाही.दारुमुळे कर्ता पुरुष बेकार होतो.अपघातात मृत्युमुखी पडतो, अथवा नैराश्यातून आत्महत्या करतो त्याच्या व्यसनेत त्या महिलेचा दोष नसताना त्या महिलेवर आयुष्यभर दुःखाचे संकट कोसळते. ही परिस्थिती बदलण्यासाठी आता महिलांनी पुढाकार घेणे गरजेचे आहे. विधवा महिलांना विवाहित महिलांनीच जर सन्मानाने मकर संक्रांतीला सुद्धा सोबत घेऊन तिचा सन्मान केला तरच परिवर्तनाच्या नांदीला सुरुवात होईल. मी मनीषाताई जायभाये यांनी सुरू केलेल्या या उपक्रमाला भविष्यात मुलगा आमदार संदीप भैया क्षीरसागर आणि जिल्हा परिषदेच्या माध्यमातून अधिक ताकद देण्याचा प्रयत्न करणार आहे.अशी हमी दिली. कार्यक्रमाचे बहारदार आणि मन वेधक सूत्रसंचालन विजय नागरगोजे सर यांनी केले. मान्यवरांच्या शुभहस्ते पालवन गावातील सुमारे 115 विधवा महिला मातांना साडीचोळी देऊन सन्मानित करण्यात आले यावेळी या माता भगिनींच्या डोळ्यांमध्ये आनंदाश्रू वाहत होते पती परमेश्वर आयुष्यातून निघून गेल्यानंतर पहिल्यांदाच जाहीर व्यासपीठावर आमचा सन्मान झाला हा सन्मान कायम आयुष्यात उभारी आणि ऊर्जा देणारा ठरेल असा आशावाद व्यक्त केला.
या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी गरकळ सर, भुरे सर, कदम अजिंक्य, डी.एन. सावंत, संतोष ससाने, प्रतिक जायभाये आदींनी अथक परिश्रम घेतले. साडी वाटपनंतर कार्यक्रमाची सांगता झाली.

  • व्यासपीठावरील सर्व मान्यवरांना कुंकवाच्या रंगाचे गुलाब झाड भेट देऊन संयोजकांनी एक अनोखा संदेश दिला
  • हर्बल ग्रुपचे अंबादास इंगळे आणि केंद्र प्रमुख लाहोर मॅडम यांचा व्यासपीठावर संक्रांत कुंकवा पलीकडची ग्रुप कडून अनोखा वाढदिवस साजरा करून शुभेच्छा देण्यात आल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Back to top button