पाटण:विठ्ठल कळके―
२९ एप्रिल रोजी पाटण तालुक्यात मोठ्या प्रमाणात झालेल्या वादळी पावसामुळे डोंगरपठारासह सकल भागातील गावांमधील घल प्रमाणात नुकसान झालेले आहे. त्याचबरोबर पिकांचे आणि फळबागांचेही नुकसान झालेले आहे. या नुकसानाचे तात्काळ पंचनामे करुन नुकसानग्रस्तांना मदत मिळणेसाठी अहवाल शासनाकडे सादर करावा अशा सुचना गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी पाटण प्रातांधिकारी, तहसिलदार व कृषी विभागाला दिलेल्या आहेत.
वादळी पावसामुळे श्री.देसाई यांनी तारळे परिसरातील नुकसान झालेल्या गावांना भेटी देत झालेल्या नुकसानाची प्रत्यक्ष पहाणी केली व नुकसानग्रस्तांना लवकरात लवकर मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे सांगून त्यांनी नुकसानग्रस्तांना दिलासा दिला आहे.
कोरोनाच्या संकटामुळे लॉकडाऊनच्या काळात हैराण झालेल्या तालुक्यातील जनतेला वादळी पावसामुळे नुकसानाचा मोठा फटका बसला आहे. कोरोनाचे संकट असतानाही श्री.देसाई यांनी तारळे परिसरात जाऊन घोट व मरळोशी या गावांना भेटी देऊन प्रत्यक्ष पहाणी केलेली आहे. यावेळी महसूल विभाग आणि कृषी विभागाचे संबंधित अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
श्री.देसाई यांच्या सुचनेवरून तालुक्यात वादळी पावसामुळे झालेल्या नुकसानाची पहाणी करून महसूल व कृषी विभागाकडून पंचनामे करण्याच्या प्रक्रियेस सुरुवात करण्यात आली असून तालुक्यातील मेंढोशी, बिबी, धडामवाडी, म्हावशी, सुरुल, पिपंळोशी, टोळेवाडी, नारळवाडी, आंब्रुळे, पापर्डे, मुरुड, घोट, ढोरोशी, मरळोशी, जंगलवाडी, धायटी, पाडळोशी, सडावाघापूर, काळोली, मुळगांव, येराड, नेरळे, कवरवाडी, नेचल, गोषटवाडी, किल्लेमोरगिरी, सणबूर या गावांमध्ये आणि वाड्यावस्त्यांमध्ये घरांचे तसेच चाफळ, पेठशिवापुर, किल्लेमोरगिरी, डोंगळेवाडी या गांवामध्ये पिकांचे मोठे नुकसान झाले असून या नुकसानाचे पंचनामे करण्याचे काम महसूल व कृषी विभागामार्फत प्रगतीपथावर सुरु आहे.