बीड:आठवडा विशेष टीम―बीड तालुक्यातील मौजे मसेवाडी येथिल मसेवाडी तलावाजवळील ४० लोकसंख्या असलेल्या मोरेवस्तिला तहसिल प्रशासनाच्या आडमुठेपणाचा फटका बसला असून पाण्यासाठी ३ की.मी.पायपीट करावी लागते, जिल्हाधिकारी बीड यांनी तलावातील पाणी लोकांना पाणी टंचाई निर्माण होऊ नये यासाठी तलावातील पाणी आरक्षित करा असे आदेश दिले आहेत.परंतु आदेशाचे काटेकोरपणे पालन करतो हे दाखवण्यासाठी मोटार व वायर काढले.त्यामुळे आता पाणीटंचाई बरोबरच अंधारात रहावे लागते. आमची पाण्याची सोय करावी, टँकर सुरू करावे अन्यथा एखादी मोटार चालू ठेवण्याची परवानगी द्यावी अशी मागणी जिल्हाधिकारी बीड यांना मोरे वस्तिकरांनी केली आहे.
अंजना सुरेश मोरे :
आमच्या तलावातील बुडीत क्षेत्रात पिण्याच्या पाण्यासाठी खड्डा खोदून मोटर टाकली होती , तहसिलदाराने वायरसकट काढून टाकली,आता आम्ही पाणी कुठुन प्यायचे, कोरोना रोगामुळे गावाच्या बाहेर आमच्या शेतरानात राहतोय, लाईट सुद्धा काढुन टाकली.आम्हाला आता २-३ किलोमीटर अंतरावर पिण्याच्या पाण्यासाठी, सांडपाणी , जनावरांना पाणी पाजण्यासाठी अडचण आली आहे, सरकारने आमच्या पाण्याची सोय करावी.
सारीका सतिश मोरे :
आता सध्या आम्हाला पाण्याची अडचण आली आहे.अगोदर मसेवाडी तलावातील बुडीत क्षेत्रातील खोदलेल्या खड्यातुन मोटारव्दारे पाणी यायचे त्यामुळे पिण्याच्या पाण्याची, सांडपाण्याची, जनावरांसाठी पाण्याची अडचण नव्हती.आता तहसिलदारांने मोटारी आणि वायर काढल्याने ३ किलोमीटरवर पाण्यासाठी पायपीट करावी लागते. सरकारने आमची तलावाच्या क्षेत्रातील मोटार चालू करण्याची परवानगी द्यावी नाहीतर टँकर सुरू करून आमची ४० लोकांची पाण्याची सोय करावी.
डॉ.गणेश ढवळे लिंबागणेशकर :
मा.राहुल रेखावार साहेब जिल्हाधिकारी बीड यांनी तलावातील पाणी आरक्षित ठेवावे ज्यामुळे उन्हाळ्यात लोकांना पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होऊ नये असे आदेश दिले आहेत.मात्र सांगकाम्या तहसिल प्रशासनाने मोरे वस्ति वरील ४० लोकांच्या पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्नाचा काहीही विचार न करता मोटार आणि वायर काढून टाकले. ग्रामस्थांनी तहसिल प्रशासनातील अधिकारी यांना विनंती केली होती कि आपण प्रत्यक्ष पहा आमच्याकडे शेती भिजवण्यासाठी सध्या तरी शेतात कोणतेही पिक उत्पादन लागवड नाही, त्यामुळे केवळ एक मोटार जरी चालु ठेवली तरी मोरे वस्तीवरील ४० लोकांना आणि जनावरांना पाण्यासाठी पायपीट करावी लागणार नाही, परंतु तहसिल प्रशासनाने ऐकले नाही. आता मोटरी काढल्या परंतु त्यांना टँकर व्दारे पाणी पुरवठा करणे ही प्रशासनाची जिम्मेदारी आहे. आधिकाराचा वापर मोटारी व वायर काढताना वापरला परंतु त्यांना टँकर व्दारे पाणीपुरवठा करण्याचे सोयीस्कर दुर्लक्ष केले आहे.संबधित प्रकरणी डॉ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांनी जिल्हाधिकारी मार्फत मुख्यमंत्री, पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री, ग्रामविकास मंत्री, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य तथा पालकमंत्री बीड यांना लेखी निवेदन ई-मेलद्वारे पाठवले आहे.