परळी वैजनाथ, दि. ११(प्रतिनिधी) :दि. १० फेब्रुवारी रोजी जेष्ठ साहित्यिक आबासाहेब वाघमारे गुरुजींचा अमृतमहोत्सवी कार्यक्रम परळी वैजनाथच्या नागरिकांनी आयोजित केला होता. मुंडे बंधू-भगिनी या कार्यक्रमात एकाच व्यासपीठावर आल्याने या कार्यक्रमाची चर्चा राजकीय वर्तुळात होणे स्वाभाविक होते. मात्र, कार्यक्रम खरा गाजवला तो कवी इंद्रजीत भालेरावांनी असे म्हणावे लागेल.
विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते ना. धनंजय मुंडे यांनी मागील अर्थसंकल्पीय अधिवेशनात सभागृहात “माझ्या गावाकडे चल माझ्या दोस्ता..” ही कवीता सादर करत सरकारवर ताशेरे ओढले होते. त्यावेळी मुंडेंनी ती कवीता कवी शामसुंदर सोन्नर यांची असल्याचा उल्लेख सभागृहात केला होता. नेमका हाच धागा पकडून कवी इंद्रजीत भालेरावांनी “ती” कवीता माझी आहे असे म्हणत आपले म्हणणे ठामपणे मांडले.
यावर आपल्या भाषणात ना. धनंजय मुडेंनी दिलगिरी व्यक्त करत “अर्थसंकल्पीय भाषण मोठे होते. त्यात दोन कवीता होत्या. एक भालेरावांची तर दुसरी सोन्नर यांची. वेळेअभावी एकचं कवीता सभागृहात सादर करता आली. पण, अनावधानाने माझ्या कार्यालयाने त्या कवीतेखाली सोन्नर यांचे नाव टाकल्याने गोंधळ झाला त्याबद्दल मी खेद व्यक्त करतो. तसेच याबाबत मी विधान परिषदेतील संबंधित व्यक्तींशी पत्रव्यवहार करुन चूक सुधारेल” असे आश्वासन दिले.
धनंजय मुंडेंकडून पगार घेऊन घात करणारे आप्तस्वकीय
विरोधी पक्षनेते झाल्यापासून धनंजय मुंडेंच्या कार्यालयाचे आपणच सर्वेसर्वा असल्याचे भासवणारे प्रशांत जोशींनी मुंडेंना अडचणीत आणण्याची कोणतीच संधी सोडली नाही अशी चर्चा राष्ट्रवादी काँग्रेसचेच कार्यकर्ते दबक्या आवाजात करत असतात. मुंडेंना त्यांच्या कार्यालयाने अडचणीत आणणारे पुढील काही प्रातिनिधिक उदाहरणे;
१. जुलै २०१६ मध्ये कोपर्डी बलात्कार प्रकरणातल्या आरोपीचा गृहमंत्री राम शिंदे यांच्यासोबत फोटो आहे, असा आरोप करून खळबळ उडवून देणारे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्यावर दिलगीरी मागण्याची वेळ आली होती.
२. धनंजय मुंडे यांचे ट्विटर चालवणाऱ्याने नोव्हेंबर २०१६ मध्ये सुरू असलेल्या नगरपालिकेच्या रणधुमाळीत “मी हेलिकॉप्टरने फिरत असलो तरी विकासाची *ब्लू फिल्म* खिशात घेऊन फिरतो” असे ट्विट केल्याने सोशल मीडियात ते चांगलेच ट्रोल झाले होते.
३. व्हॉट्सअॅपने बल्कमध्ये मॅसेज पाठविणाऱ्यांना बॅन करण्याचा दणका दिला आहे. व्हाट्सअॅपने अशी मशीन लर्निंग सिस्टिम बनविली आहे, जिच्या आधारे खोटे मॅसेज किंवा मोठ्या प्रमाणावर मॅसेज पाठविणाऱ्यांचा नंबरच बंद करण्यात येतो. असे जवळपास दर महिन्याला २० लाख अकाऊंट व्हाट्सअॅप बंद करत आहे. धनंजय मुंडेंच्या स्वीय सहाय्यक जोशींच्या मोबाईलमधून देखील मोठ्या प्रमाणावर मेसेज पाठवल्याने त्यांचं व्हाट्सअप बॅन करण्यात आलं होतं तेव्हा “डिजीटल आणीबाणी” सारखे उथळ आरोप मुंडेंच्या कार्यालयाने केले होते. त्यानंतर काही तासांनी व्हाट्सअॅप सुरू झाले अन पुन्हा “ती” व्यवस्था तोंडावर पडली.
४. सध्या सुरू असलेल्या परिवर्तन यात्रेदरम्यान “कोल्हापूर येथे आयोजित असलेल्या सभेसाठी धनंजय मुंडे जात होते. त्यावेळी अचानक वाऱ्याच्या झोतामुळे त्यांचे हेलिकॉप्टर भरकटले आणि कोल्हापूरऐवजी ते बीड येथे उतरले” असे संदेश मुंडेंच्या माहिती जनसंपर्क अधिकाऱ्याने पाठवले. तेवढ्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने असे काहीही घडले नाही हे अधिकृतरित्या सांगण्यात आले.
यांसह अनेक घटना आहेत ज्यामुळे धनंजय मुंडे ज्यांना पगारी नौकर म्हणून कामाला ठेवतात तेच त्यांना अडचणीत आणतात असे वारंवार पहायला मिळते. एक सक्षम विरोधी पक्षनेता म्हणून सरकारला सातत्याने घेरत आपल्या चांगल्या कामाने सर्वांवर प्रभाव टाकणाऱ्या मुंडेंना त्यांचीच व्यवस्था अडचणीत का आणत असावी हे संबंधितांनाचं ठाऊक.
पीआरओचे वास्तव काय?
शासकीय व्यवस्थेत मुख्यमंत्रीच पीआरओ अर्थात माहिती जनसंपर्क अधिकारी म्हणून नियुक्ती करू शकतात. इतर संवैधानिक पदांसाठी अशी व्यवस्था अजूनतरी अस्तित्वात नाही. परंतू, धनंजय मुंडेंच्या विधीमंडळातील कार्यालयात प्रशांत जोशींच्या दालनावर “पीआरओ” असा नामफलक लावलेला आहे. मुख्यमंत्री असो वा विरोधी पक्षनेते त्यांच्यासाठी काम करणाऱ्या व्यक्तीचे वेतन जर सरकार करत असेल तर तिने किंवा त्याने संबंधितांबाबत फक्त शासकीय बातम्या तयार करणे किंवा प्रसारित करणे अभिप्रेत असते. मात्र, वास्तवात असे होताना दिसत नाही.