मूल:बिंबिसार शहारे― चंद्रपूरवरुन गोंदियाकडे जाणार्या मालगाडी रेल्वेने बारा रानडुक्करांना चिरडल्याची घटना काल शुक्रवारी पहाटे मूलपासून जवळच असलेल्या चिचोली गावाजवळ घडली. बल्लारपूर ते गोंदिया असा रेल्वेमार्ग या भागातून गेला आहे. लागूनच बफरचे जंगल असल्याने येथे वन्यजीव प्राण्यांचा मुक्तसंचार आहे. वन्यप्राण्यांची रेल्वे मार्गावरुन आणि रेल्वे रुळावरुन मुक्तपणे भटकंती सुरु असते. आज पहाटे रानडुक्करांचा कळप येथे संचार करीत असताना नेमके त्याच वेळेस गेलेल्या मालगाडी खाली सापडल्या गेला. यात सर्वच बारा रानडुक्कर चिरडल्या गेले. पहाटे घडलेली ही घटना सकाळी उघडकीस आली. यावेळी चिचोली गावातील आणि मूलमधील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली. वनविभागाचे अधिकारी आाणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळाचा पंचनामा करुन त्याच परिसरात बाराही रानडुकरांना एका खड्ड्यात गाडण्यात आले. यावेळी मूल येथिल क्षेत्र सहायक खनके, वन कर्मचारी मरसकोल्हे, वन्यजीव अभ्यासक उमेशसिंह झिरे उपस्थित होते. याआधी सुद्धा केळझर मार्गावरील रेल्वे रुळावर रेल्वेने वाघीण आणि बछडे तसेच अस्वलीस चिरडल्याची घटना घडलेल्या आहेत.
0