पाटोदा तालूका ग्रामिण पत्रकारांनी दिले ग्रामविकास मंत्री ना.पंकजाताई मुंडेंना निवेदन
पाटोदा (आठवडा विशेष): सध्या बीड जिल्ह्यात सर्वत्र पाणी टंचाईची समस्या भेडसावत असून त्यातच पाटोदा तालुक्यात ही पाणी टंचाईच्या झळा मोठया प्रमाणात जाणवत आहेत.पाटोदा शहराला सौताडा येथील तलावातून टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात येत होता. परंतु पाटोदा तहसीलदार यांनी या संदर्भात सौताडा येथील ग्रामस्थांच्या मागणीनुसार परिस्थिती लक्षात घेऊन सुरू असलेले पाणी पुरवठा बंद करण्यात यावा. या विषयी पत्र मुख्याधिकारी नगर पंचायत पाटोदा यांच्या नावाने दिले होते. पाणी टंचाई व समाजहितासाठी पत्रकार पोपट कोल्हे यांनी बातमी प्रसिध्द केल्याचा राग मनात धरून पाटोदा तहसिलदार मॅडम यांनी पत्रकार पोपट कोल्हे यांच्या विरोधात बदनामी केल्याचा पोलीसात गुन्हा दाखल केला. पत्रकार कोल्हे यांच्यावर दाखल केलेला खोटा गुन्हा तात्काळ मागे घेण्यात यावा. अन्यथा पत्रकारांच्या वतीने तीव्र अंदोलन करण्यात येईल असे निवेदन संत भगवानबाबा यांच्या जन्मभूमी सावरगाव येथील छोटेखानी कार्यक्रमात दिनांक १७ /०२ /२०१९ रविवार रोजी ग्रामविकास तथा पालकमंत्री नामदार पंकजाताई मुंडे यांना पाटोदा तालुका ग्रामीण पत्रकार यांनी दिले. या वेळी पत्रकार बबनराव उकांडे, संजय सानप, आनिल गायकवाड, भाऊसाहेब पवार, यशवंत सानप, शेख आरिफ, सचिनराजे पवार, काका जाधव, चंद्रकांत पवार बाळू कुमखाले, अरूण येवले, अमोल येवले, साईनाथ येवले यांच्या सह पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.