प्रशासकीयब्रेकिंग न्युज

‘एआय’च्या सहाय्याने महाराष्ट्र अन्नधान्य निर्यातीत सर्वोत्तम ठरू शकतो — देबजानी घोष

आठवडा विशेष टीम―

मुंबई, दि. ०५: ‘एआय’चा वापर करून महाराष्ट्र अन्नधान्य उत्पादनात आणि निर्यातीत जगातील सर्वोत्तम राज्य बनू शकतो, असा विश्वास निती आयोगाच्या फेलो आणि नॅसकॉमच्या माजी अध्यक्षा देबजानी घोष यांनी व्यक्त केला.

‘टेक वारी – महा तंत्रज्ञान प्रशिक्षण सप्ताह’ अंतर्गत मंत्रालयात आयोजित कार्यक्रमात ‘विकसित महाराष्ट्रासाठी फ्रंटियर तंत्रज्ञान’ या विषयावर त्या बोलत होत्या. यावेळी महाराष्ट्र सदनच्या निवासी आयुक्त आर. विमला उपस्थित होत्या. मंत्रालयातील अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

देबजानी घोष म्हणाल्या, “सध्या जग अन्नधान्याच्या तुटवड्याच्या संकटाला सामोरे जात आहे. महाराष्ट्राकडे तज्ज्ञ, कृषी उपकरणे, प्रशिक्षित कामगार आणि नव्या तंत्रज्ञानाचा उपयोग करण्याची क्षमता आहे. योग्य नियोजन आणि प्रभावी अंमलबजावणीद्वारे राज्य अन्नधान्याच्या जागतिक निर्यातीत आघाडीवर राहू शकते. नवीन तंत्रज्ञान, सुधारित बियाणं, ड्रोन, सिंचन प्रणाली यांचा वापर करून कृषी क्षेत्रात उत्पादनक्षमता वाढवता येईल.

२०२० ते २०३० हे दशक कृत्रिम बुद्धिमत्तेचे (एआय) पर्व असणार आहे. कृषी, आरोग्य, ऊर्जा आणि उत्पादन क्षेत्रात ‘एआय’च्या साहाय्याने मूलभूत बदल घडवता येऊ शकतात. बायोटेक म्हणजे जीवशास्त्र आणि ‘एआय’ यांचा संयोग आहे. बायोटेक म्हणजे जीवन नव्याने घडविणे होय. महाराष्ट्र राज्याच्या प्रगतीचा पाया म्हणजे ‘आयआयटी’ मुंबईसारखी शिक्षणसंस्था, स्टार्टअप इकोसिस्टम, उद्योगजगत, डिजिटल इकॉनॉमी, ग्रीन एनर्जी आणि प्रगत धोरणे यामुळे राज्य देशाच्या ‘जीडीपी’मध्ये मोठा वाटा उचलू शकते. असेही त्यांनी सांगितले.

आर. विमला यांनी सांगितले की, फक्त ‘एआय’वर अवलंबून राहून चालणार नाही, तर विज्ञान आणि ‘एआय’ व इतर आघाडीच्या तंत्रज्ञानांच्या साहाय्याने उद्योग आणि कृषी क्षेत्रात ठोस योजना आखून काम करणे गरजेचे आहे. त्यासाठी अंमलबजावणी अत्यंत महत्त्वाची असल्याचेही त्यांनी सांगितले.

०००

श्रद्धा मेश्राम/विसंअ/

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Back to top button