ज्येष्ठ साहित्यिक प्रा.रंगनाथजी तिवारी यांचा राजेसाहेब देशमुख यांनी केला हृद्य सत्कार
अंबाजोगाई (प्रतिनिधी): राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाच्या महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य आकादमीच्या वतीने दिला जाणारा “महाराष्ट्र भारती अखिल भारतीय हिंदी सेवा पुरस्कार 2017-18″ हा प्रख्यात साहित्यिक व अंबाजोगाईचे भूषण असलेले प्रा.रंगनाथजी तिवारी यांना नुकताच जाहिर झाला आहे. त्याबद्दल बीड जिल्हा परिषदेच्या शिक्षण व आरोग्य समितीचे सभापती राजेसाहेब देशमुख यांनी तिवारी यांचा त्यांच्या निवासस्थानी जावून शनिवार,दि.23 फेब्रुवारी रोजी हृद्य सत्कार केला.
यावेळी जिल्हा परिषद सदस्य संजयभाऊ दौंड, पंचायत समिती सदस्य प्रा.प्रशांत जगताप,पं. उद्धवबापु आपेगावकर, वसंतराव मोरे,उपप्राचार्य प्रा.भगवान शिंदे, पत्रकार रणजित डांगे, स्वप्नील सोनवणे, व्यंकटेश गायकवाड दौलत साखरे,सुनिल धपाटे,हनुमंत कदम, बाळासाहेब जगताप आदी मान्यवरांची उपस्थिती होती.
या प्रसंगी बीड जिल्हा परिषदेच्या शिक्षण व आरोग्य समितीचे सभापती राजेसाहेब देशमुख यांनी प्रा.रंगनाथजी तिवारी यांचा फेटा बांधून शाल, पुष्पगुच्छ,पुष्पहार देवून, पेढा भरवून हृद्य सत्कार केला.यावेळी आपल्या भावना व्यक्त करताना राजेसाहेब देशमुख म्हणाले की,ज्येष्ठ साहित्यिक प्रा.रंगनाथजी तिवारी सरांना राज्य शासनाचा अत्यंत प्रतिष्ठेचा हा पुरस्कार मिळाला आहे. यापुर्वी ही त्यांना विविध मान सन्मान,पुरस्कार मिळालेले आहेत. प्रा.तिवारी सरांचे कार्य हे साहित्य क्षेत्रात अतिशय उंचीचे असून त्यांनी हिंदी भाषिक साहित्यासाठी दिलेली लेखनसेवा ही अत्यंत मोलाची,मौलिक आहे. त्यांच्यामुळे अंबाजोगाई साहित्य क्षेत्रात ओळखली जाते. त्यांच्या या कार्यामुळेच गतवर्षी झालेल्या मराठवाडा साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाचा बहुमान बीड जिल्हा परिषदेच्या शिक्षण समितीच्या वतीने सभापती म्हणून आम्ही त्यांना बहाल केला.या पुरस्कारामुळे प्रा.तिवारी कुटुंबातील सदस्य व त्यांचा विद्यार्थी मला मनस्वी आनंद होत आहे.सरांना निरोगी दिर्घायु लाभो व सरांच्या हातून यापुढेही आधिकाअधिक साहित्य सेवा घडावी अशी अपेक्षा याप्रसंगी राजेसाहेब देशमुख यांनी व्यक्त केली.तर सत्काराला उत्तर देताना ज्येष्ठ साहित्यीक प्रा. रंगनाथजी तिवारी यांनी हा सन्मान म्हणजे कौटुंबीक स्नेहमिलन आहे.राजेसाहेब देशमुख यांच्या सारखा कर्तबगार सभापती शिक्षण व आरोग्य विभागाला मिळाला.त्यामुळे ग्रामिण भागातील शिक्षणाच्या व आरोग्याच्या दर्जेदार सोयी सुविधा बीड जिल्ह्यात उपलब्ध झाल्या आहेत.साहित्य, शिक्षण व सांस्कृतिक जाण ठेवून अत्यंत तळमळीने दिवसाचे 24 तास जनहितासाठी राबणारे राजेसाहेब हे अष्टपैलू नेतृत्व असल्याचे सांगुन सत्काराबद्दल तिवारी यांनी यावेळी उपस्थित सर्वांचे आभार मानले व आशिर्वाद दिले.