अंबाजोगाई:आठवडा विशेष टीम― महाराष्ट्रातील पत्रकारांच्या वेतन व नौकरी विषयक समस्या सोडवून त्यांना कायमस्वरुपी उत्पन्नाचे साधन व आर्थिक पाठबळ उपलब्ध करून देण्यासाठी स्वतंत्र महामंडळ स्थापन करावे अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभागाचे राज्य समन्वयक संजय बालासाहेब वाघमारे यांनी शनिवार,दिनांक 18 जुलै 2020 रोजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे,केंद्रीय पर्यावरण,माहिती आणि दूरसंचार मंत्री प्रकाशजी जावडेकर तसेच राज्य माहीती व जनसंपर्क विभागाचे सचिव यांना पाठवलेल्या मेलद्वारे केली आहे.महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभागाचे राज्य समन्वयक संजय बालासाहेब वाघमारे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,आज सरकार कोरोना (COVID-19) संसर्गजन्य आजाराला हरविण्यासाठी मोठे प्रयत्न करीत आहे.महाराष्ट्र राज्यातील लॉकडाऊनच्या काळात कुणीही अन्नधान्यापासून उपाशी राहु नये याची काळजी घेवून त्यासोबतच तत्पर आरोग्य सुविधा पुरविली जात आहे.याबाबत काळजी घेत राज्यामध्ये शासनासोबत,सामाजिक संस्था,विविध संघटना कार्यरत आहेत.या संकटाच्या काळात आपले काय होईल याची तमा न बाळगता अहोराञ काम करणा-या पत्रकारांना राज्यातील काही मोठ्या वृतपत्र समूहाने पत्रकारांचे पगार देण्यास पैसेच नसल्यामुळे चक्क कामावरून कमी करण्यात आलेले आहे.सामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम करणा-या पत्रकारांना, आपल्या कर्मचा-यांना माध्यम संस्थाच कामावरून काढत आहेत.अनेक वर्षे या कर्मचा-यांनी अशा माध्यम संस्थांच्या भरभराटीसाठी काम केलेले आहे.मोठ्या माध्यम समुहासाठी काम करणा-या जिल्हा,तालुकास्तरावरील काही पत्रकारांना थोडे फार मानधन दिले जाते.मात्र जिल्हास्तरीय वृत्तपत्रांसाठी काम करणा-या ग्रामीण भागातील पत्रकारांना मानधन किंवा साधा पगार ही मिळत नाही.जाहीरात प्रसिध्दीतून मिळणा-या मानधनावर पत्रकारांच्या कुटुंबियांची गुजराण होते.पत्रकारांच्या
मुलांचे शिक्षण,आरोग्य विषयक सुविधा यावरील पत्रकारांचा मोठा खर्च होत आहे.महाराष्ट्रात केवळ अधिस्विकृतीधारक पत्रकार बांधवांना सर्व शासकीय सोयी,सुविधा मिळतात.त्याच प्रमाणे तालुका व ग्रामीण पञकारांना सर्व शासकीय सोयी,सुविधा मिळाव्यात.ज्येष्ठ पत्रकारांना पेन्शन मिळावी.तसेच तरूण पत्रकारांना स्वउद्योगासाठी एखादे महामंडळ स्थापन करून कर्जपुरवठा करण्यात यावा.असंख्य पत्रकारांना तर उत्पन्नाचे दुसरे कोणतेही साधन नसल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आलेली आहे.नौकरी गेल्याने अनेक पत्रकारांना कोरोनाच्या काळात दुसरीकडे कुठे नौकरी मिळवायची असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा आहे.लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेले पत्रकारिता हे क्षेत्र आज कमकुवत होत असेल तर देशाचे उद्याचे भविष्य चांगले असणार नाही.त्यामुळे कुठल्याही परिस्थितीत सामाजिक जाणिवेतून पत्रकार यांना न्याय देण्याचे काम आपण करावे अशी विनंती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभागाचे राज्य समन्वयक संजय वाघमारे यांनी दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.
0