अंबाजोगाई (प्रतिनिधी): ‘जगद्गुरू तुकोबाराय साहित्य परिषद,बीड’ यांच्या वतीने मंगळवार,दि.१ डिसेंबर २०२० रोजी रात्री ठिक ०८ : ०० वा.’गझलदिवाळी’ या आॅनलाईन गझल मुशायरा चे झुम अॅपद्वारे आयोजन करण्यात आले.या उपक्रमाला गझलकार व रसिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला.
जिल्हाध्यक्ष ज.तु.सा.प.बीड शिवश्री विश्वंभर वराट,शिवश्री नागनाथ जाधव विभागीय अध्यक्ष ज.तु.सा.प. मराठवाडा,शिवमती राहीताई कदम जिल्हाध्यक्षा ज.तु.सा.प.परभणी, तांत्रीक साहाय्य डॉ.राहुल देशमुख जिल्हाध्यक्ष ज.तु.सा.प. उस्मानाबाद यांची प्रमुख उपस्थिती होती.यामध्ये सर्वप्रथम राष्ट्रमाता जिजाऊ व जगद्गुरू तुकोबाराय यांच्या प्रतिमेचे पूजन व जिजाऊ वंदना गायन ज.तु.सा.प.बीड जिल्हासचिव शिवश्री प्रमोद जाधव यांनी केले.यामध्ये विविध जिल्ह्यातील गझलकारांचा सहभाग होता.पुण्याचे सुप्रसिद्ध ज्येष्ठ गझलकार ‘सुगंधा’ लघुपटात अभिनय केलेले शिवश्री सुनिलनाना पानसरे हे गझल मुशायरा चे अध्यक्ष होते. शिवश्री डॉ.देवराव चामनर अंबाजोगाई , शिवश्री ईश्वर मते अकोला, शिवश्री आत्माराम जाधव गंगाखेड, शिवश्री आत्तम गेंदे पालम,शिवमती प्रा.सारिका बकवाड नांदेड,शिवश्री प्रमोद जाधव अंबाजोगाई, बहारदार सूत्रसंचालन करणारे ज्येष्ठ गझलकार शिवश्री अरविंद सगर परभणी हे सहभागी झाले होते.
डॉ.चामनर यांनी ‘हव्यास कोणताही आता मनांस नाही.. हिसकावुनी कुणाचा घेणार घास नाही’…’घेता कुणा न आला केव्हाच ठाव माझा.. नाही कधी कुणाला कळला स्वभाव माझा’.., प्रा. सारिका बकवाड यांनी ‘ओळखावे माणसांनी माणसांना.. ना दुखावे त्या कुणाच्या आसवांना..’,’दुःख आतले जेव्हा-जेव्हा उसळत असते..’ ‘गझल होउनी कागदावरी उतरत असते..’, प्रमोद जाधव यांनी ‘का कशाने मातले सरकार आहे?’ अन् बळी फासावरी लाचार आहे..’ ,’नाही मुळीच मी ही इतका गुलाम आता..’ ‘करणार ना कुणाला झुकुनी सलाम आता..’आत्तम गेंदे यांनी ‘दिवे लावुनी दिवा दारोदारी किती उजळतो संसार बघू..’ ‘दिव्याखालचा माहित आहे उजेडातला अंधार बघू..’ ,’तुझा नि माझा दोघांचाही धर्मच लवचिक व्हावा आता..’ ‘दोघांनाही करता यावा प्रेमावरती दावा आता..’ आत्माराम जाधव यांनी ‘फक्त वाऱ्याचेच भरले कान त्याने..’ ‘घेतले जिंकून अख्खे रान त्याने’, ‘केवढी चर्चेमध्ये ही वात असते’, ‘संपणारे तेल अंधारात असते’. ईश्वर मते यांनी ‘ही चळवळ विचारांची मागे का सरत नाही’, ‘कायम प्रश्न नथ्थुचा गांधी का मरत नाही’, सरहद्दीवर मी कशाला दुश्मनांशी भांडतो’, ‘मी तुम्हाला सरहद्दी वरची कहाणी सांगतो’, अरविंद सगर यांनी ‘भोवताली माजले भंगार हल्ली’, ‘उकिरड्यांचा होतसे सत्कार हल्ली’, ‘राजवस्त्रे मागतो ना गोधडे तर मागतो मी’, ‘जेवढे कष्टात माझ्या तेवढे तर मागतो मी’, अध्यक्ष सुनील नाना पानसरे यांनी ‘असलो जरी मराठा जय भीम बोलतो मी’, ‘शिवबा समान बाबा इतकेच जाणतो मी’, ‘कर्ज मी काढून गरजा भागवत नाही कधीही’, ‘स्वाभिमानी या मनाला लाजवत नाही कधीही’ अशा सुंदर गझलांचे सादरीकरण झाले.त्यानंतर आभारप्रदर्शन प्रमोद जाधव यांनी केले व कार्यक्रम संपन्न झाला.