राज्याने आतापर्यंत दिले ८६६ कोटी ८४ लाख रुपये
आठवडा विशेष | प्रतिनिधी
मुंबई दि. ०८ :राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री तथा जिल्हयाच्या पालकमंत्री ना पंकजाताई मुंडे यांनी केलेल्या प्रयत्नांमुळे राज्य सरकारने आज नगर-बीड-परळी रेल्वेमार्गासाठी आणखी ७५ कोटी रुपयांचा निधी वितरित केला आहे. आतापर्यंत राज्याने या मार्गाला ८६६ कोटी ८४ लाख रुपये इतका निधी उपलब्ध करून दिला आहे.
बीड जिल्हयाच्या जिव्हाळ्याचा प्रश्न असलेल्या परळी-बीड-नगर रेल्वेमार्गाचे काम सध्या गतीने सुरू आहे. लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या प्रथम स्मृती दिनाच्या एक दिवस अगोदर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या मार्गाची घोषणा करून त्यासाठी २ हजार ८२६ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला. हा प्रकल्प पुर्ण व्हावा यासाठी पालकमंत्री ना पंकजाताई मुंडे व खा डाॅ प्रितमताई मुंडे हया सातत्याने सरकार दरबारी प्रयत्न करत आहेत. प्रकल्पासाठी लागणा-या एकूण खर्चापैकी ५० टक्के हिस्सा राज्य सरकारकडून केंद्रीय रेल्वे बोर्डास उपलब्ध करून देण्याचा निर्णय राज्याने मंत्रिमंडळ स्तरावर घेतलेला आहे, त्यानुसार सदर मार्गाकरिता राज्याने ३१ मार्च २०१८ अखेरपर्यंत एकूण ८६६ कोटी ८४ लाख रुपये इतका निधी उपलब्ध करून दिला आहे. या प्रकल्पासाठी रेल्वे विभागाने २ नोव्हेंबर २०१८ च्या पत्रान्वये मागणी केल्याप्रमाणे निधी वितरित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती, त्यानुसार आज ७५ कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यात आला असून गृह विभागाने तसे आदेश निर्गमित केले आहेत. या निधीमुळे प्रकल्पाच्या कामास आणखी गती मिळण्यास मदत होणार आहे.