कुतुहलाशिवाय संशोधन जन्म घेत नाही ―प्राचार्य डॉ.दत्तात्रय आघाव

पाटोदा (शेख महेशर) दि.०१ :कोणत्याही नवीन गोष्टीचे कुतूहल वाटल्या शिवाय संशोधन करण्याची प्रेरणा मिळत नाही असे प्रतिपादन प्राचार्य डॉ. दत्तात्रय आघाव यांनी केले.
येथील नवगण शिक्षण संस्था संचालित वसंतदादा पाटील महाविद्यालयात राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते.व्यासपीठावर उपप्राचार्य डॉ.मधुकर क्षीरसागर, प्रा. नंदकुमार पटाईत, पदव्युत्तर विभाग संचालक डॉ. मनोजकुमार प्रकाश, पर्यवेक्षक प्रा.रमेश टाकणखार उपस्थित होते.तर प्रमुख वक्ते म्हणून डॉ. गणेश पाचकोरे, प्रा.अशोक डोंगरे व डॉ.महादेव काळे हे उपस्थित होते.
कार्यक्रमात सर्वप्रथम सर सी. व्ही. रमण यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक विज्ञान मंडळाच्या अध्यक्ष डॉ.ज्योती क्षीरसागर यांनी केले. डॉ.पाचकोरे यांनी प्राचीन व आधुनिक काळात विज्ञानाची भूमिका व योगदान या विषयी सविस्तर मार्गदर्शन केले. प्रा.अशोक डोंगरे यांनी विज्ञान दिनाची पार्श्वभूमी स्पष्ट करत युवकांनी शास्त्रांचा अभ्यास करणे गरजेचे आहे असे मत व्यक्त केले. डॉ.महादेव काळे यांनी शास्त्रज्ञ बनण्यासाठी आवश्यक क्षमतांचे विश्लेषण या प्रसंगी केले.
प्राचार्य डॉ. आघाव पुढे म्हणाले की, समाजात दाखवले जाणारे चमत्कार हे चमत्कार नसून विज्ञानाचे प्रयोग असतात. विज्ञानाची ओळख प्रत्येकाला झालीच पाहिजे. वैज्ञानिक संशोधना साठी फार मोठया व सुसज्ज प्रयोगशाळाच लागतात असे नव्हे तर संशोधनाची प्रेरणा ही कुठेही मिळू शकते.संशोधनात सातत्य ठेवले तर मानवजाती साठी कल्याणकारक अशा कित्येक नवनव्या गोष्टींचे शोध भविष्यात लागू शकतील म्हणून विद्यार्थ्यांनी नेहमी चिकित्सक असेल पाहिजे.
विज्ञान शाखे मार्फत आयोजित करण्यात आलेल्या निबंध, प्रश्नमंजुषा व पोस्टर स्पर्धां मधील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके वितरित करण्यात आली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.अनिता धारासूरकर यांनी केले तर आभार डॉ.प्रमोद गायके यांनी मानले.