भारतीय वायुदलाचे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान अखेर वाघा बॉर्डरवरुन भारतात परतले

वाघा बॉर्डर दि.०१ : पाकिस्तानच्या ताब्यात असलेले भारतीय वायुदलाचे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान अटारी-वाघा सीमेवरुन भारतात दाखल झाले आहेत. पाकिस्तानकडून जाणीवपूर्वक भारतीय अधिकाऱ्यांना मानसिक त्रास देण्यात आला.कारण, दोन वेळा अभिनंदन यांना सुपूर्द करण्याची वेळ बदलण्यात आली. कागदपत्राच्या प्रक्रियेची पूर्तता झाल्यानंतर रात्री सव्वानऊ वाजण्याच्या सुमारास ते भारतात दाखल झाले.सकाळपासूनच वाघा बॉर्डरवर लोकांनी अभिनंदन यांच्या स्वागतासाठी गर्दी केली होती. भारतीय हवाई दलाच्या उच्च-अधिकाऱ्यांच्या पथकाने हार्दिक अभिनंदन यांचे मायभूमीत स्वागत केले. अभिनंदन यांचे आई-वडील यावेळी उपस्थित होते.यावेळी अटारी-वाघा बॉर्डरवर कडक सुरक्षा ठेवली होती.ढोल-ताशे, हार तुऱ्यांसह भारतीय नागरिकांनी विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांच स्वागत केलं.पाकिस्तानी रेंजर्सने विंग कमांडर अभिनंदन यांची पिस्तुल परत करत, मानाने त्यांना पाठवलं.अभिनंदन यांनी पाकिस्तानची सीमा ओलांडून भारतीय हद्दीत प्रवेश करताच तेथे उपस्थित भारतीय नागरिकांनी त्यांचे टाळ्यांच्या कडकडाटात स्वागत केले.
पाकिस्तानच्या ताब्यात गेल्या तीन दिवसांपासून असलेले अभिनंदन वर्धमान वाघा बॉर्डर ओलांडून अखेर मायदेश असलेल्या भारतात पतरले आहेत. भारतीय वायुदलाचे विंग कमांडर अभिनंदन यांना वाघा बॉर्डरवरुन थेट जयपूरला आणण्यात आले. तेथून त्यांना दिल्लीला आणले जाणार आहे. दरम्यान,भारतीय हवाई दलाने पुलवामा हल्ल्याचा बदला घेत पाकिस्तानात घुसून हवाई हल्ला करत बालाकोट येथील दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केले होते. भारताने केलेल्या कारवाईमुळे चिडलेल्या पाकिस्तानने बुधवारी भारतीय हद्दीत घुसखोरी केली. मात्र, भारतीय हवाई दलाने पाकिस्तानची अमेरिकन बनावटीची एफ १६ विमाने पळवून लावली.भारताने पाकिस्तानचे एक लढाऊ विमान पाडले असून त्यावेळी आपले मिग २१ विमान पाकिस्तानी हद्दीत कोसळून विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांना पाकिस्तानने ताब्यात घेतले होते. यानंतर भारत सरकारने त्यांच्या सुटकेसाठी सर्वोतोपरी प्रयत्न सुरु केले होते.