सोयगाव:ज्ञानेश्वर धोंडू पाटील― सोयगाव शिवारातील डोक्यावरील कर्जाचा बोजा फेडण्याच्या चिंतेत अल्पभूधारक शेतकऱ्याने गुरुवारी शेतातच निंबाच्या झाडाला गळफास घेवून जीवन संपविले आहे.या प्रकरणी सोयगाव पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून या घटनेमुळे सोयगाव शहरात खळबळ उडाली आहे.
शांताराम बोमटू चौधरी (वय ६५) असे आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याचे नाव आहे.शांताराम चौधरी यांचेकडे सोयगाव शिवारात गट क्रमांक-१६० मध्ये अल्प शेती आहे.या शेतात त्यांनी विविध पीककर्ज काढून खरीपाची पेरणी केली परंतु अतिवृष्टीमुळे उत्पन्न हाती न आल्याने कर्जाचा बोजा फेडण्याच्या विवंचनेत त्यांनी गळफास घेवून शेतातच आत्महत्या केली असल्याचे कुटुंबीयांनी सांगितले.आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याने शेतात कापूस पिकांची लागवड केली होती,परंतु अतिवृष्टीमुळे कापसाचे झालेले नुकसान आणि नुकसानीतून शासनाने वगळणी केल्याने शेतकऱ्याची नुकसान होवूनही मावेजा मिळणार नसल्याने चिंता अधिकच वाढली होती.आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे शव ग्रामीण रुग्णालयात आणून त्यांचेवर शवविच्चेदन करण्यात येवून शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.त्यांच्या पश्चात पत्नी,दोन मुले आणि एक मुलगी असा परिवार आहे.शिवसेनेचे माजी शहरप्रमुख गजानन चौधरी यांचे ते काका होते.