अंबाजोगाई (प्रतिनिधी) दि.10: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मा.सरकार्यवाह भय्याजी जोशी हे मंगळवार,दि.19 मार्च रोजी अंबाजोगाईत येत असून त्यांच्या हस्ते स्व. मा.मा.क्षीरसागर यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकणा-या ‘माणिक-मोती’ या स्मृतीग्रंथाचे प्रकाशन होणार आहे. अशी माहिती माजी प्राचार्य डॉ.अ.द.पत्की व बिपीन क्षीरसागर यांनी दिली आहे.
या प्रसंगी पद्मभुषण आदरणीय डॉ.अ.ल. कुकडे (पुर्व संघचालक, पश्चिम क्षेत्र),मधुकरराव जाधव (प्रांतसंघचालक, देवगिरी प्रांत) आणि डॉ.सुरेंद्रजी आलुरकर (अध्यक्ष,भा.शि.प्र. संस्था,अंबाजोगाई) या मान्यवरांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.मामा क्षीरसागर यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकणारा आणि भारतीय शिक्षण संकल्पनेवरील महाराष्ट्रातील शिक्षण तज्ज्ञांचे चिंतनपर लेख असलेला,मा.मां.चे समकालीन सहयोगी, विद्यार्थी व कुटुंबिय यांच्या आठवणींनी समृद्ध झालेला ‘माणिक -मोती’ स्मृतीग्रंथ साकार झाला आहे.हा ग्रंथ युवा पिढीला निश्चितच पथदर्शक प्रेरणास्त्रोत ठरेल असा विश्वास आहे.या ग्रंथाच्या प्रकाशन समारंभाच्या कार्यक्रमाची जय्यत तयारी सुरू असून हा कार्यक्रम मंगळवार,दि. 19 मार्च रोजी अंबाजोगाई येथील खोलेश्वर माध्यमिक विद्यालयाच्या मैदानावर सायंकाळी 6 वाजता संपन्न होणार आहे.तरी या कार्यक्रमास अंबाजोगाई शहर व परिसरातील नागरिकांनी उपस्थित रहावे असे आवाहन माजी प्राचार्य डॉ.अ.द.पत्की व बिपीन क्षीरसागर यांनी केले आहे.
मा.मा.क्षीरसागर यांचा जीवन परिचय…!
मराठवाड्यातील अग्रगण्य शिक्षण संस्था म्हणुन ख्यातकिर्त असलेल्या भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेच्या प्रारंभीच्या जडण-घडणीमध्ये व विकासामध्ये स्व.मा.मा. क्षीरसागर यांचे मोलाचे योगदान राहिले आहे. आदरणीय मा.मा.हे रा.स्व.संघाचे लातूर विभाग कार्यवाह तसेच विभाग संघचालक होते. विद्या प्रतिष्ठाणच्या कार्याचा विस्तार व विकास संपुर्ण महाराष्ट्रात करण्यासाठी ते सतत कार्यरत राहिले. मा.मा.हे मुळचे अहमदनगर जिल्ह्यातील मोहरी गावचे रहिवासी ते नाशिक जिल्ह्यातील नांदगाव येथील माध्यमिक शाळेत मॅट्रीकच्या परिक्षेत प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाले. भाग्यनगरला उच्च शिक्षण पुर्ण केल्यानंतर त्यांनी मराठवाड्यातील उदगीर येथील शामलाल विद्यालयाचे मुख्याध्यापक म्हणून शिक्षण क्षेत्रात कार्यास आरंभ केला.त्यांची विचारधारा संघाची असल्याने या विचारांचे वर्तनसंकेत,अनुशासन व शिस्त या आधारे त्यांनी आपले जीवन व्यतीत केले. रा.स्व.संघावरील पहिल्या बंदीच्या काळातील सत्याग्रहात त्यांनी सक्रिय सहभाग घेतला होता.संघ आदेशानुसार अंबाजोगाईला आल्यानंतर त्यांनी खोलेश्वर माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक म्हणून सेवेस प्रारंभ केला.पुढे भा.शि.प्र.संस्थेच्या विस्तार व विकासामध्ये त्यांचे मौलाचे योगदान राहिले आहे.1975 ला तत्कालीन सरकारने आणिबाणी जाहिर करून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक, समाजवादी व अन्य विचारांच्या कार्यकर्त्यांना कारागृहात टाकले होते. स्व.मा.मा.क्षीरसागर हे नाशिक येथील कारागृहात 19 महिने होते.मा.मा.हे एक कुशल संघटक, सर्जनशील,उपक्रमशील व व्यासंगी व्यक्तीमत्व होते.रा.स्व.संघ क्षेत्राबाहेरही त्यांचा मोठा मित्र परिवार होता. शिक्षण क्षेत्रातील त्यांच्या कार्याविषयी भोवतालच्या परिसरात त्यांच्या विषयी आदरभाव होता.ते एक ऊर्जाकेेंद्र होते.11 ऑक्टोंबर 2017 रोजी वृद्धापकाळाने मा.मां.चे निधन झाले.