औरंगाबाद:ज्ञानेश्वर डी.पाटील―औरंगाबाद जिल्हयास ४६ हजार ८५८ मेट्रीक टन एवढ्या खताचा पुरवठा झाला आहे. याशिवाय जिल्हयात यापुर्वीची खते शिल्लक असुन खतांचे उत्पादन व वाहतूक अत्यावश्यक सेवा म्हणून सुरळीतपणे चालु असल्याने खतांची मुबलक प्रमाणात उपलब्धता असल्याचे जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी सांगितले.
कोविड-१९ च्या पार्श्वभुमीवर आगामी खरीप हंगामात खते व बियाणे यांचा शेतकऱ्यांना पुरवठा व नियोजनासाठी १९ मे रोजी जिल्हाधिकारी उदय चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीस जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी डॉ. तुकाराम मोटे, कृषि विकास अधिकारी श्री आनंद गंजेवार, जिल्हा उपनिबंधक दाभशेडे, तंत्र अधिकारी श्री प्रशांत पवार, माफदाचे अध्यक्ष जगन्नाथ काळे, आरसीएफ कंपनीचे विभागीय व्यवस्थापक श्री डेकाते व जिल्हा व्यवस्थापक जाकिर शेख, इफको कंपनीचे जिल्हा व्यवस्थापक श्री कुलकर्णी, माफदाचे सचिव प्रकाशचंद मुथा तसेच डीएमओ उपस्थित होते.
जिल्हाधिकारी पुढे म्हणाले की, औरंगाबाद जिल्हयास मे अखेर ६०८१५ मे.टन इतक्या आवटंनाच्या तुलनेत आजअखेर ४६८५८ मे.टन खतांचा पुरवठा झाला आहे. यामध्ये युरीया १५५७मे.टन, संयुक्त खते १८४०६ मे.टन, एसएसपी ८१३९ मे.टन, एमओपी ४०११ मे.टन व डीएपी ५२४मे.टन खतांचा समावेश आहे असल्याचे सांगूण जिल्हाधिाकरी पुढे म्हणाले की लॉक डाऊन असल्याने मध्यंतरी काही रेक येण्यास व हाताळणीसाठी वेळ लागला असल्यामुळे युरीया वगळता इतर खतांचा आवटंनाप्रमाणे पुरवठा झाला आहे. पुढील १२ दिवसात युरीया खताच्या पाच रेक उपलब्ध होणार असुन कृभको व नॅशनल फर्टिलायझर लि. या कंपन्यांच्या दोन रेक पुढील दोन ते तीन दिवसात जिल्हयात येणार आहेत. तसेच जून मध्ये सुध्दा युरीयासह इतर खतांच्या रेक सतत उपलब्ध होतील याबाबत नियोजन व संनियत्रंण तसेच पाठपुरावा कृषि विभागाकडून करण्यात येत असल्याचे ही त्यांनी सांगितले.
बैठकीतील महत्वाचे निर्णय-
- युरीयाचा नियमित पुरवठा होण्यासाठी मा. जिल्हाधिकारी यांनी मा. आयुक्त कृषि यांच्याशी चर्चा करुन खताचे २०% आवटंन वाढवून तात्काळ उपलब्ध करुन देण्याबाबत विनंती केली आहे.
- सोयगाव व कन्नड तालुक्यातील दुर्गम भागात जळगाव व पाचोरा येथील रेक पॉईटवरुन १५० मे.टन खते उपलब्ध करुन देण्याबाबत मा. संचालक ( नि व गुनि ) यांनी कंपन्यांना निर्देश दिले आहेत. त्यामुळे याभागातील खतांच्या पुरवठयाचा मार्ग मोकळा.
- काही विक्रेत्यांकडे ePos मशिन व प्रत्यक्षातील खत साठयामध्ये फरक असल्यास तो ताबडतोब जुळवून घेण्याबाबत विक्रेत्यांना निर्देश दयावेत व त्यांचे साठे तपासुन घ्यावेत. यापुढे असा फरक ज्याच्याकडे असेल किंवा ePos मशिनवर जास्त साठा असेल त्यांना यापुढे खते उपलब्ध करुन देण्यात येणार नाहीत.
- औरंगाबाद जिल्हा रेड झोनमध्ये असल्याने खतांच्या वाहतूकी व हाताळणीबाबत औरंगाबाद रेल्वे रेक पॉईटवर ताण येत असल्यास पर्यायी ऑरेंज झोनमधील जालना, अहमदनगरमधील कोपरगाव, नाशिकमधील नांदगाव या औरंगाबाद जिल्हयाच्या सिमेवरील रेक पॉईटवरुन खतांचा पुरवठा करण्याबाबत पर्यायी व्यवस्था म्हणून मा. आयुक्त कृषि यांना कळविण्यात आले.
- आगामी खरीप हंगाम लक्षात घेता औरंगाबाद जिल्हयातील ग्रामीण भागातील कृषि सेवा केंद्र सकाळी ७ ते सायंकाळी ९वाजेपर्यंत चालू ठेवण्याबाबत तसेच दुकानामध्ये सुरक्षित सामाजिक अंतर ठेऊन तसेच स्वच्छतेविषयक इतर सर्व उपाययोजना करुन सुरु ठेवण्याबाबत सुचना निर्गमित करण्यात आल्या.
- खरीप हंगामात पाऊस पडल्याबरोबर शेतकऱ्यांची गर्दी होऊ नये यासाठी कृषि विक्रेत्यांनी ते दरवर्षी ज्या शेतकऱ्यांना कृषि निविष्ठा विक्री करतात त्यांच्याशी आताच भ्रमणध्वनीवरुन संपर्क करुन त्यांची बियाणे व खतांची मागणी नोंदवून घ्यावी व गावनिहाय यादया करुन कृषि साहित्यांचे वाटप गावात घरपोच करण्याबाबत कृषि साहित्य विक्रेते संघटनेस आवाहन करण्यात आले आहे. यासाठी प्रत्येक विक्रेत्याने आपल्या नियमित ग्राहकांचे व्हाटॲप ग्रुप तयार करुन जास्तीत जास्त निविष्ठा गावात उपलब्ध करुन देण्याचे नियोजन करावे.