ब्रेकिंग न्युजमहाराष्ट्र राज्यराजकारण

बारामती जिंकण्याचे स्वप्न पाहणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी नागपूरच्या निकालाची चिंता करावी ― धनंजय मुंडे

मुळशी दि.१९: सध्या भारतीय जनता पार्टीच्या सर्वच नेत्यांना बारामतीची जागा जिंकण्याच्या कल्पनेने पछाडलेले आहे. मात्र बारामतीची जागा जिंकण्याचे स्वप्न पाहणा-या मुख्यमंत्र्यांनी आणि भाजपाच्या नेत्यांनी नागपूरच्या निकालाची चिंता करावी असा टोला विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी लगावला आहे.

बारामती लोकसभेच्या आघाडीच्या उमेदवार खा. सुप्रियाताई सुळे यांच्या प्रचारार्थ मुळशी येथे आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पासून ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पर्यंत भाजपाच्या सर्वच नेत्यांनी बारामतीवर लक्ष केंद्रित केले आहे त्याचा संदर्भ घेऊन बोलतांना धनंजय मुंडे म्हणाले की श्री शरद पवार साहेबांनी, अजितदादांनी या भागात शेती, औद्योगिक, शैक्षणिक प्रगती केली आहे. पवार साहेब हे या भागातील जनतेचे स्वाभिमान आहेत त्यामुळे ही जागा तर आम्ही जिंकूच पण त्याच बरोबर महाराष्ट्रातील 29 आणि नागपूरची 30 वी जागा ही आघाडी जिंकेल असा विश्वास व्यक्त केला.

नागपूरची जागा जिंकण्याचा विश्वास नसल्यानेच इंदोर मधून उभे राहण्याची चर्चा सुरू असल्याचा टोला त्यांनी लगावला. मोदी यांनी पवार आणि कुटुंबियांची इतकी धास्ती घेतली आहे की , त्यांना वर्धा असो की औसा, कुठेही बारामती, मावळ आणि माढाच दिसते आहे असा टोलाही लगावला.

आपल्या सुप्रियाताईंना विजयी करून मुळशीकरांनी आपलं खणखणीत नाणं मुख्यमंत्र्यांना दाखवावं असे आवाहन मुंडे यांनी केले.

बारामतीकर खरंच भाग्यवान आहेत की अनेकदा उत्कृष्ट संसदपटू म्हणून सन्मानित झालेल्या सुप्रियाताई या मतदार संघास लाभल्या आहेत. आणि या उमद्या नेतृत्वाचा प्रचार करण्याची संधी मला मिळाली हे माझं भाग्य आहे असे ते म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Back to top button