अंबाजोगाई:आठवडा विशेष टीम― ग्रामीण भागातील प्रत्येक शाळेमध्ये आज नाविण्यपुर्ण पद्धतीने स्नेहसंमेलन विविध उपक्रमाने साजरे करण्यात येते.वार्षिक स्नेहसंमेलनाच्या आयोजनामुळे विद्यार्थ्यांना एक सशक्त व्यासपीठ मिळते.यामुळे विद्यार्थ्यांच्या कला-गुणांचा विकास होतो.शिक्षणासोबतच जिल्ह्याच्या ग्रामीण भागात सांस्कृतिक क्रांती होताना दिसत आहे.स्नेह संमेलनातून नवे कलावंत तयार होवून ते समाजाला मिळतात.विद्यार्थ्यांत स्टेज करेज वाढवून त्याचा फायदा त्यांच्यातील सुप्त गुणांच्या विकासाला होतो असे विद्यार्थी पुढे विविध क्षेत्रात नावारूपास येतात व आपले कर्तृत्व सिद्ध करतात.पालकांनी विद्यार्थ्यांमधील कलागुणांना चालना देण्यासाठी त्यांना स्नेहसंमेलनासहीत विविध उपक्रमात आवर्जुन सहभागी होण्यासाठी प्रोत्साहन द्यावे असे आवाहन जिल्हा परिषद सदस्य राजेसाहेब देशमुख यांनी केले.
अंबाजोगाईत आद्यकवी मुकुंदराज सभागृहात सोमवार, दि.10 फेब्रुवारी रोजी सरस्वती पब्लिक इंग्लिश स्कुल देवळा आणि एंजल इंग्लिश स्कुल अंबाजोगाई यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित वार्षिक स्नेह संमेलनाचे उद्घाटक म्हणुन राजेसाहेब देशमुख बोलत होते. यावेळी व्यासपीठावर साई प्रेम सागर बहुउद्देशिय सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष अमर भोसले, मुख्याध्यापिका वंदना भोसले तर प्रमुख पाहुणे म्हणुन तानाजी मोरे,गटशिक्षणाधिकारी रंगनाथ राऊत,केंद्रप्रमुख बी.एन.डांगे, ताराचंद शिंदे,जाधव,अकोला गावचे सरपंच श्रीनिवास आगळे, तडोळा गावचे सरपंच मधुकर आडसुळे,नेताजी आगळे,सोनू विरगट या मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्वलन करण्यात आले.त्यानंतर मान्यवरांचा स्वागत सोहळा संपन्न झाला.कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापिका वंदना भोसले यांनी केले तर उपस्थितांचे आभार संस्थेचे अध्यक्ष अमर भोसले यांनी मानले.या कार्यक्रमास विद्यार्थी, माता पालक व पिता पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उद्घाटन सोहळ्यानंतर विद्यार्थ्यांनी आपले विविध कलाविष्कार,वैयक्तीक नृत्य, समुह नृत्य,मराठी गीते,हिंदी गीते,शालेय कवितांवर आधारीत गीते,बालनाटीका सादर केल्या.