प्रशासकीयब्रेकिंग न्युज

जिल्ह्यातील एकही शेतकरी पंचनाम्यापासून वंचित राहणार नाही याची दक्षता घ्या

आठवडा विशेष टीम―

लातूर:- जिल्ह्यात काही मंडळामध्ये अतिवृष्टी तर काही मंडळात संततधार पाऊसामुळे सोयाबीन व इतर पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या नुकसानीच्या पंचनाम्यात एकही शेतकरी वंचित राहणार नाही याची संबंधित अधिकारी वर्गाने दक्षता घ्यावी अशा स्पष्ट सूचना राज्याचे महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिल्या.

जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समिती सभागृहात आयोजित अतिवृष्टी पिक नुकसान व कोरोना संसर्ग आढावा बैठकीत ते बोलत होते.या बैठकीस जिल्हाधिकारी जी. श्रीकांत, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल, मनपा आयुक्त देवीदास टेकाळे, अधिष्ठाता डॉ.मोहन डोईबळे, शिवसेना जिल्हा प्रमुख संतोष सोमवंशी व नामदेव चाळक उपस्थित होते.

या बैठकीस मार्गदर्शन करताना राज्यमंत्री अब्दुल सत्तार म्हणाले, जिल्ह्यात अतिवृष्टी व संततधार पावसामुळे सोयाबीन व इतर पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या पिक नुकसानीचे पंचनामे तात्काळ पूर्ण करुन एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी अशा स्पष्ट सूचना त्यांनी दिल्या.राज्यातील महाआघाडीचे सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहून मदत करणारच आहे. प्रशासनाने तात्काळ पंचनामे पूर्ण करुन अहवाल शासनास पाठवावा. शासनाकडे आर्थिक अडचण असली तरी शेतकऱ्यांसाठी राज्य शासन कर्ज काढून मदत करेल.असे राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी स्पष्ट केले.

जिल्ह्यात कोरोना संसर्गाबाबत बोलताना राज्यमंत्री म्हणाले की, जिल्ह्यात कोरोना संसर्ग कमी होत चाललेला आहे. ही जरी बाब समाधानाची असली तरी यापुढे काही महिने माझे कुटुंब-माझी जबाबदारी याचे भान ठेवून प्रत्येकाने भौतिक अंतर, मास्कचा वापर करणे नितांत गरजेचे आहेत. भविष्यात कोरोना संसर्ग होणार नाही याची प्रत्येकाने काळजी घ्यावी असे आवाहन त्यांनी केले.व जिल्ह्यात कोरोना संसर्गावर प्रशासनाने केलेल्या कार्याबद्दल जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांचे त्यांनी कौतुक केले.

जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे ग्रामीण भागातील रस्त्याचे मोठे नुकसान झाले आहे. यामध्ये काही सार्वजनिक बांधकाम विभाग व काही रस्ते जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाअंतर्गत येतात. या नुकसान झालेल्या सर्व रस्त्याच्या दुरुस्तीचे कामे संबंधित विभागाने तात्काळ सुरु करावीत. अशा सूचना यावेळी त्यांनी दिल्या. बैठकीच्या प्रारंभी नविन जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणांत महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते वृक्षरोपण करण्यात आले.

याबैठकीस निवासी उपजिल्हाधिकारी विजयकुमार ढगे, उपविभागीय अधिकारी सुनील यादव, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. लक्ष्मण देशमुख, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.गंगाधर परगे,प्रशासनातील अधिकारी उपस्थित होते.या बैठकीचे प्रस्ताविक जिल्हा कृषि अधिक्षक दत्तात्रय गावसाने, व जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी केले. तहसिलदार महेश सावंत यांनी आभार मानले.

राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्याकडून अतिवृष्टी झालेल्या औसा तालुक्यातील लांमजना ,किल्लारी व निलंगा तालुक्यातील मदनसुरी व लिंबाळा या गावातील प्रत्यक्ष शेतीच्या बांधावर जावून सोयाबीन ,तूर, ऊस पिकाचे नुकसान झालेल्या भागाची पाहणी केली, शेतकरी बांधवांशी संवाद साधला व त्यांची निवेदने स्वीकारून आस्थेवाईकपणे चौकशी केली. या अतिवृष्टीमुळे नुकसान झालेला एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही. राज्यातील महाआघाडी शासन येणाऱ्या काही दिवसांमध्येच शेतकऱ्यांस निश्चितच मदत करणार असल्याचे अभिवचन दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Back to top button