बीड दि. ०२:आठवडा विशेष टीम― पंकजाताई मुंडे ग्रामविकास मंत्री असतांना त्यांनी मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतंर्गत बीड जिल्हयासाठी मंजूर केलेली १०८ कोटीची ग्रामीण रस्त्यांची कामे रद्द करण्यात येत असल्याचा आदेश शासनाने काढला आहे. विद्यमान पालकमंत्र्यांचे हे अपयश असून स्वतःची खुर्ची शाबूत ठेवण्यासाठी ते जिल्हयाला विकासा पासून वंचित ठेवण्याचे पाप करत आहेत अशी टीका भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांनी केली आहे.
पंकजाताई मुंडे यांचे सत्तेच्या काळात बीड जिल्हयावर विशेष लक्ष होते, विविध योजनांच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांचा निधी त्यांनी आणून जिल्हयाला विकासाच्या महामार्गावर आणण्याचे काम केले. ग्रामविकास मंत्री म्हणून काम करतांना या खात्यातंर्गत मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून त्यांनी कोट्यवधी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला, त्यांनी मंजूर केलेली जिल्हयातील १७० किमी ची ३४ कामे ज्याची किंमत १०८ कोटी १८ लाख इतकी आहे, अशी सगळी कामे महा विकास आघाडीच्या सरकारने नुकताच एक आदेश काढून रद्द केली आहेत. रद्द करण्यात आलेली तालुकानिहाय रस्त्याची कामे अशी : बीड- १४ कोटी ३५ लाख ( १९ किमीची ४ कामे), अंबाजोगाई- ३३ कोटी ८४ लाख ( ५४ किमीची १३ कामे), केज- ४८ कोटी ८४ लाख (८२ किमीची ११ कामे), गेवराई- ८ कोटी ४३ लाख (११ किमीची ३ कामे), माजलगांव- २ कोटी ७३ लाख ( ५ किमीची ३ कामे)
पालकमंत्र्यांचे अपयश
बीड जिल्हयाला कर्तव्यशुन्य पालकमंत्री लाभल्यामुळे विकासाच्या महामार्गावर चाललेला जिल्हा आता पुन्हा एकदा मागे पडत आहे. सत्ता आल्यापासून एखादी नवी योजना किंवा निधी तर सोडाच परंतु पंकजाताई मुंडे यांच्या कार्यकाळात मंजूर झालेली कामे व निधी रद्द करण्याचा सपाटा विद्यमान सरकारने लावला आहे. जिल्हयाविषयी आताच्या पालकमंत्र्यांना अजिबात कळवळा वाटत नाही, कोट्यवधी रुपयांचा निधी देखील वाचवू शकले नाहीत, हे तर त्यांचे सपशेल अपयश आहे अशा शब्दांत मस्के यांनी टीका केली आहे.