यवतमाळ दि.१५:आठवडा विशेष टीम― खरीप हंगामाला सुरवात होताच जिल्ह्यात बियाणे आणि खतांची मागणी वाढली आहे. शेतक-यांना उत्कृष्ट दर्जाचे बियाणे आणि खते मिळण्यासाठी कृषी विभागाकडून करण्यात येणा-या उपाययोजनांबाबत जिल्हाधिकारी एम.डी.सिंह यांनी आढावा घेतला. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित या बैठकीला निवासी उपजिल्हाधिकारी ललितकुमार व-हाडे, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी नवनाथ कोळपकर, कृषी विकास अधिकारी पंकज बरडे आदी उपस्थित होते.
जिल्ह्यात बियाणे आणि खतांचा तुटवडा होणार नाही, याबाबत कृषी विभागाने लक्ष द्यावे, असे सांगून जिल्हाधिकारी श्री.सिंह म्हणाले, जिल्ह्यासाठी खतांचे रॅक पॉईंट वाढविण्यात आले आहे. नांदेड आणि चंद्रपूर येथील रॅक पॉईंटवरून खते उपलब्ध होत आहे. यावेळी कृषी अधिक्षक कोळपकर म्हणाले, जिल्ह्यात युरियाची काही प्रमाणात कमतरता असली तरी शेतक-यांनी काळजी करण्याचे कारण नाही. जिल्ह्यासाठी 17 हजार मे.टन युरिया लवकरच उपलब्ध होणार आहे. शेतक-यांनी मिश्र खतांचा वापर करावा. युरीया हे विशेषता ऊसाकरीता वापरण्यात येते, असे त्यांनी सांगितले.
जिल्ह्यासाठी कोरोमंडल कंपनीची 24:24:0:8 व 20:20:0:13 ही 2600 मे.टन खते, नागार्जुन कंपनीची 2600 मे. टन युरिया, आरसीएफ कंपनीचा युरिया व 15:15:15 ही 2600 मे. टन खते, इफको कंपनीची 20:20:0:13 ही 2600 मे. टन खते, कृभको कंपनीची 2600 मे. टन युरीया खताची रेक, स्पीक कंपनीची युरिया व 20:20:0:13 खताची 2600 मे. टनाची रेक आणि आयपीएल कंपनीची युरीया खताची 2600 मे. टनाची रेक येत्या आठ दिवसामध्ये जिल्ह्यात उपलब्ध होणार असल्याची माहिती बैठकीत देण्यात आली.
0