छावणी मंजूरीची प्रक्रिया सुरूच राहणार; गरज असेल त्याठिकाणी चारा छावणी देणार
बीड, दि. ०२ :दुष्काळात सापडलेल्या शेतक-यांच्या पशूधनाला आधार देण्यासाठी राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री ना पंकजाताई मुंडे यांनी जिल्हयात आतापर्यंत ११० चारा छावण्यांना मंजूरी दिली आहे, तथापि छावणी मंजूरीची प्रक्रिया ही सुरूच राहणार असून वेळोवेळी आढावा घेऊन गरज असेल त्याठिकाणी चारा छावणी देणार असल्याचे पालकमंत्री ना पंकजाताई मुंडे यांनी सांगितले आहे.
यावर्षी जिल्हयात तीव्र दुष्काळ असून दुष्काळात सापडलेल्या शेतकर्यांच्या पशूधनासाठी शासनाने छावण्या सुरू करण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यानुसार पालकमंत्री पंकजाताई मुंडे यांनी पुर्वीच्या आष्टी तालुक्यात दिलेल्या २५ व आता अन्य ठिकाणी ८५ छावण्यांना संमती दर्शविली आहे. बीड तालुक्यात ५९, आष्टी पुर्वीच्या २५ व आता २३ अशा एकूण ४८, गेवराई ०१ आणि शिरूर तालुक्यात ०२ अशा ११० छावण्यांना संमती देण्यात आली आहे. उर्वरित तालुक्यातील प्रस्तावाची जिल्हाधिकारी स्तरावर छाननी सुरू असून गरज असेल तिथे ते ही प्रस्ताव लवकरच मंजूर केले जाणार आहेत.
मंजूरीची प्रक्रिया सुरूच राहणार
दुष्काळामुळे शेतकरी संकटात आहे, याची सरकारला तसेच प्रशासनाला पुर्ण जाणीव आहे, त्या अनुषंगाने आम्ही पावले उचलली आहेत. गरज असेल त्याठिकाणी चारा छावणी देणार आहे, कोणावरही अन्याय होणार नाही. तालुका निहाय प्रस्ताव तयार करण्यास जिल्हाधिका-यांना आदेशित केले आहे, वेळोवेळी आढावा घेऊन छावण्यांना मंजूरी दिली जाईल. एखाद्या गावांत एका पेक्षा अधिक छावणीची गरज असेल तर तिथेही मंजूरी दिली जाईल त्यामुळे ही प्रक्रिया सुरूच राहणार असल्याचे पालकमंत्री ना पंकजाताई मुंडे यांनी सांगितले आहे.