प्रशासकीयब्रेकिंग न्युजमहाराष्ट्र राज्य

‘वंदेभारत’ अभियानांतर्गत मुंबईत येणाऱ्या प्रवाशांची संख्या अर्ध्या लाखावर

मुंबई, दि. २५ : वंदेभारत अभियानांतर्गत विविध देशातून मुंबईत ५० हजार १४९ प्रवासी दाखल झाले असून हे प्रवासी ३५९ विमानांद्वारे मुंबईत आले आहेत.

आलेल्या एकूण प्रवाशांमध्ये मुंबईतील प्रवाशांची संख्या  १६ हजार ७४६ इतकी आहे.  उर्वरित महाराष्ट्रातील प्रवाशांची संख्या १७ हजार ४२१ इतकी तर इतर राज्यातील प्रवाशांची संख्या  १५ हजार ९८२ इतकी आहे. ३१ जुलै २०२० पर्यंत ६८ विमानांनी आणखी प्रवासी येणे अपेक्षित आहे.

कोरोना विषाणुविरुद्ध शासन निग्रहाने लढत असतांना परदेशात अडकलेल्या महाराष्ट्रातील व इतर राज्यातील नागरिकांना मुंबईत उतरवून घेऊन त्यांना कॉरंटाईन करण्याची जबाबदारी महाराष्‍ट्र शासनामार्फत पार पाडली जात आहे.

या देशातून आले प्रवासी

ब्रिटन, सिंगापूर, फिलीपाईन्स, अमेरिका, बांगलादेश, मलेशिया, कुवेत, अफगाणिस्तान, ओमान, दक्षिण अफ्रिका, इंडोनिशिया, नेदरलँड, जपान, श्रीलंका, म्यानमार, टांझानिया,स्पेन, आर्यलँड, कतार, हाँगकाँग,  कझाकीस्तान, मॉरिशियस, ब्राझील, थायलंड, केनिया, मियामी,व्हियतनाम, इटली, स्विडन, इथोपिया, रोम, जर्मनी,दुबई,मालावी,वेस्ट इंडिज,नॉर्वे, कैरो, युक्रेन,रशिया, मादागास्कर, नायजेरिया, ऑस्ट्रेलिया, न्युझिलंड सौदी अरेबिया, कॅनडा, पूर्व अफ्रिका, फ्रान्स, नैरोबी, न्युयॉर्क, जॉर्जिया, कामेरुन, युनायटेड अरब अमिराती, कांगो अशा विविध देशातून प्रवासी मुंबईत दाखल झाले आहेत.

आलेल्या प्रवाशांचे कॉरंटाईन

बृहन्मुंबईतील प्रवाशांसाठी संस्थात्मक कॉरंटाईनची सुविधा विविध हॉटेल्समध्ये करण्यात आली आहे. इतर जिल्ह्यातील व राज्यातील प्रवाशांना त्यांच्या जिल्हा मुख्यालयी पाठविण्याचे काम  जिल्हाधिकारी, मुंबई उपनगर यांच्या मार्फत करण्यात येत आहे. हे प्रवासी त्यांच्या जिल्ह्यात गेल्यानंतर त्यांच्या जिल्हाधिकारी तसेच महानगरपालिका आयुक्तांमार्फत त्यांना कॉरंटाईन करण्याचे काम करण्यात येत आहे.

महसूल व वन विभाग, आपत्ती व्यवस्थापन,  मदत आणि पुनर्वसन विभाग यांच्या दिनांक २४ मे २०२० च्या मार्गदर्शक सुचनेनुसार आलेल्या प्रवाशांना कॉरंटाईन करण्याचे काम करण्यात येत आहे.

इतर राज्यातील प्रवाशांची व्यवस्था

इतर राज्यातील प्रवाशांचे वाहतूक पासेस संबंधित राज्याकडून प्राप्त होईपर्यंत या प्रवाशांना मुंबईतील कॉरंटाईन सेंटरमध्ये ठेवले जात आहे तसेच या प्रवाशांचे वाहतूक पास संबंधित राज्याकडून प्राप्त होताच त्यांना त्यांच्या राज्यात पाठविण्यात येत आहे. वंदेभारत अभियानातील कामकाज जिल्हाधिकारी कार्यालय, मुंबई उपनगर,बृहन्मुंबई महानगरपालिका, प्रादेशिक  परिवहन अधिकारी, बेस्ट, महाराष्ट्र राज्य रस्ते वाहतूक महामंडळ, भारतीय विमानतळ प्राधीकरण, मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्राधिकरण लि.  यांच्या समन्वयाने केले जात आहे.

वंदेभारत अभियान केंद्रीय नागरी उड्डाण मंत्रालय, विदेश मंत्रालय व केंद्रीय गृह मंत्रालय यांच्या समन्वयाने महाराष्ट्र शासन यशस्वीरित्या पार पाडत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Back to top button