लातूर:आठवडा विशेष टीम―
मानवी जीवनात मनुष्याला चिंतनाच्या माध्यमातून आत्मशक्ती काय आहे याचा साक्षात्कार होतो असे प्रतिपादन शतायुषी राष्ट्रसंत वसुंधरारत्न डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज यांनी केले.
लातूर शहरातील बसवेश्वर चौक परिसरातील चन्नबसवेश्वर कॉलेजच्या सभागृहात डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज सत्संग मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या 74 व्या भव्य सत्संग सोहळ्यात डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज बोलत होते. या सत्संग सोहळ्याच्या संयोजक सौ. लताताई मुद्दे या होत्या तर आयोजक श्रीमती लक्ष्मीबाई हणमंतराव तत्तापुरे चंद्रकांत हणमंतराव तत्तापुरे,राजेंद्र हणमंतराव तत्तापुरे परिवार हे होते. उपस्थित भाविकांना मार्गदर्शन करताना डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज पुढे म्हणाले की, विश्वातील अन्य प्राणिमात्रांच्या तुलनेत मनुष्याचा जन्म फार वेगळा आहे. तब्बल 83 हजार 999 योनींमध्ये जन्म घेतल्यानंतर मनुष्य देहाची प्राप्ती होत असते.इतर प्राण्यांच्या तुलनेत मानवाला विवेक, भावना , जाणीव आदी गोष्टी ईश्वराने बहाल केल्या आहेत. म्हणूनच अन्य सजीव प्राण्यांच्या मानाने मानव बुद्धिमान प्राणी म्हणून गणला जातो. जीवनात वावरताना प्रत्यक्षात देव कोणीही पाहिलेला नसतो. पण, त्याचे अस्तित्व प्रत्येकजण मान्य करतो. देवापेक्षा अधिक सामर्थ्य मानवाकडे, त्याच्या भक्तांकडे आहे. आपल्या भक्तीच्या जोरावर मनुष्य देवत्वही मिळवू शकतो. मात्र प्रत्यक्ष देवाला तसे करता येत नाही. मनुष्य जीवनात कौटुंबिक परिस्थिती नेमकी कशी असते, फार पूर्वी समाजात पुरुषप्रधान नव्हे तर स्त्री प्रधान संस्कृती कशा प्रकारे कार्यान्वित होती, याविषयीही त्यांनी अत्यंत सुंदर विवेचन केले.
साक्षात्काराची तीन रूपे विशद करून डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज पुढे म्हणाले की, मनुष्याने जीवनातील प्रत्येक पाऊल विचारपूर्वक उचलले पाहिजे. नेहमी सदाचारी वृत्तीने वागण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कोणत्याही परिस्थितीत सत्याची कास सोडता कामा नये. मनुष्य जीवनात अनेकदा संघर्षाचाही सामना करावा लागतो. मात्र कोणत्याही परिस्थितीत सत्याची साथ सोडता कामा नये. समाजात अनेक सांप्रदाय आले, त्यातून संघर्षाची ठिणगी उडत गेली. त्यामुळे एकापेक्षा अनेक संप्रदाय निर्माण झाले, धर्म बाजूला फेकला गेला. त्यामुळे अहंकार वाढत गेला. अहंकाराने माणसात विकृती वाढत जाते.त्यासाठी प्रत्येकाने आपापल्या परीने सद्सद्विवेक बुद्धीने वागण्याचा प्रामाणिक प्रयत्न करायला हवा. मानवी जीवनात आपण ज्याला संसार म्हणतो, तो संसार म्हणजेच स्वार्थ असल्याचे सांगून सत्संगाच्या माध्यमातून सध्यस्थितीत केले जात असलेले जनजागृतीचे कार्य अत्यंत मौलिक असून ते यापुढेही निरंतर चालूच राहावे,अशी अपेक्षा डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराजांनी व्यक्त केली. या सोहळ्याच्या यशस्वीतेसाठी सौ. लताताई मुद्दे, शिवकांत स्वामी गुरुजी, यांसह समस्त तत्तापुरे परिवारातील सदस्यांनी परिश्रम घेतले.