अंबाजोगाई:आठवडा विशेष टीम― जाचक पेट्रोल-डिझेल इंधन दरवाढीचा निषेध करीत सोयाबीन बियाणे कंपन्यांनी निकृष्ट सोयाबीन बियाणे देवून फसवणूक केली.शेतक-यांना दुबार पेरणी करावी लागली.या बियाणे कंपन्यांकडून शेतक-यांना नुकसान भरपाई मिळवून द्या तसेच लॉकडाऊन कालावधीत मीटरचे रिडींग न घेता जास्त रिडींग लावून दिलेले वीज बील माफ करावे या मागण्यांसाठी अंबाजोगाईत उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर जयप्रभा ग्रामीण विकास मंडळाच्या वतीने सोमवार,दिनांक 27 जुलै रोजी एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आले.
उपजिल्हाधिकारी,अंबाजोगाई यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,केंद्र व महाराष्ट्र शासन गेल्या दिड ते दोन वर्षांपासुन सतत पेट्रोल व डिझेलचे दर वाढवत आहेत.त्याचा परिणाम सर्वसामान्य माणसांवर,आर्थिकदृष्ट्या मागास समाजावर होत आहे.त्यामुळे त्यांच्या विकासात अडथळा निर्माण होत आहे.संपुर्ण मराठवाड्यासह महाराष्ट्रात पेरणीसाठी योग्य बियाणे शेतक-यांना कंपनीने विकत दिले नसल्यामुळे शेतक-यांना दुबार पेरणी करावी लागली आहे.जी दुबार पेरणी केली ते पीक सुद्धा
व्यवस्थित वाढत नसल्यामुळे परत शेतक-यांचे आर्थिक नुकसान होत आहे.तसेच लॉकडाऊनच्या काळात वीज वितरण कंपनीने मीटरचे रिडींग न घेता जास्त रिडींग लावुन लाईट बील जास्त लावले आहे.ते बील माफ करावे.तसेच शेतक-यांना सोयाबीन बियाणांमुळे दुबार पेरणी करावी लागली त्यांना बियाणे कंपनीकडुन महाराष्ट्र शासनाने नुकसान भरपाई मिळवुन द्यावी.सर्वसामान्य माणसाचा विचार न करता पेट्रोल,डिझेलचे भाव केंद्र शासन सतत वाढवत आहे व सोयाबीन बियाणे उत्पादित करणा-या कंपनीने शेतक-यांना निकृष्ठ बियाणे देवुन शेतक-यांना फसवले आहे आणि लाईट बील ही वाढवुन दिले आहे.ते लाईट बील माफ करावेत.याचा निषेध म्हणुन आम्ही आपल्या कार्यालयासमोर सोमवार,दि.27 जुलै रोजी एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण करीत आहोत याची नोंद घ्यावी असे नमुद करण्यात आले.सदरील उपोषण वेळी कोविड-19 च्या प्रादुर्भावामुळे सरकारने निर्धारित केलेल्या सर्व नियमांचे पालन करण्यात आले.यावेळी पोलीस निरीक्षक,पोलीस स्टेशन,अंबाजोगाई यांचे वतीने चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.निवेदन देताना जयप्रभा ग्रामीण विकास मंडळाचे सचिव शिवाजीराव खोगरे,सामाजिक कार्यकर्ते अॅड.अनंतराव जगतकर,श्रीरंग चौधरी,दयानंद देशमुख,शिरीष आपेट,नागनाथ तोंडारे,भास्कर शिंदे,मंचकराव देशमुख,श्रीकिशन धिमधीमे यांची उपस्थिती होती.