छत्रपती संभाजीनगर दि.29– विधानसभानिवडणूकीच्या पार्श्वभमीवर दि.1 जुलै 2024 च्या आर्हता दिनांकावर आधारीत मतदार यादी विशेष संक्षिप्त पुनिरिक्षण कार्यक्रम जाहिर करण्यात आला आहे. या कालावधीत 1 जुलै ते 20 ऑगस्ट पर्यंत मतदार यादी अद्यावत करण्याचे काम बीएलओने घरोघरी जाऊन सर्वेक्षणाच्या माध्यमातून पूर्ण करावे. असे निर्देश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी पैठण येथे आढावा बैठकीत दिले.
पैठण तालुक्यातील निवडणूक विषयक तसेच कृषी विभागाची आढावा बैठक दुर्गा मंगल कार्यालय येथे आयोजित करण्यात आली होती. बैठकीस तहसिलदार सारंग चव्हाण नगरपालिका मुख्यधिकारी संतोष आगळे, तालुका कृषी अधिकारी श्री.सिरसाठ यांच्यासह ग्रामसेवक, तलाठी, कृषी सहायक व मंडळधिकारी उपस्थित होते.
बीएलओने घरोघरी जाऊन 85 वय वर्षावरील मतदारांची नोंद तसेच 100 वय वर्ष असणाऱ्यां मतदारांची विशेष नोंद गृह मतदानासाठी करुन घ्यावी. मतदारांना नजीकच्या मतदान केंद्रावर मतदान करण्याची सुविधा उपलब्ध व्हावी याची काळजी बीएलओने घेणे आवश्यक आहे. यादीतील दुबार नोंद वगळणे, मतदाराचे मतदान यादीतील नावात असलेला बदल, फोटो याविषयीच्या नोंदी अचूक करण्याची प्रक्रिया जबाबदारीने पार पडण्याचे निर्देश जिल्हाधिकारी स्वामी यांनी बीएलओनां दिले.
जल पुनर्भरण कामाचा आढावा
पैठण तालुक्यामध्ये एकाही टँकरने पाणी पुरवठा करण्याची वेळ येऊ नये यासाठी जलपुनर्भरण कार्यक्रम सक्रीय पणे राबविणे आवश्यक असून यासाठी कृषी सहायक, ग्रामसेवक, तलाठी यांनी तालुक्यातील प्रत्येग गावाचे सर्वेक्षण करुन विहिरीचे, बोरवेल जलपुनर्भरण करण्याबाबतचे मोहिम राबवावी. यासाठी रोहियो अंतर्गत त्याच बरोबर नाविन्य पूर्ण उपक्रम राबवून लोकसहभागातून जास्तीत जास्त जलपुनर्भरणाचे काम करावे. याबाबतचा आढावा 10 दिवसानंतर घेण्यात येणार असल्याचे श्री.स्वामी यांनी सांगितले.
प्रत्येक गावामध्ये पाणी व्यवस्थापन, ‘माझी शाळा सुंदर शाळा’ ‘एक पेड माँ के नाम’ तसेच इतर विभागाच्या योजनाचा समन्वयाने अंमलबजावणी करावी. याबरोबरच प्रत्येक गावातील पायाभूत सुविधा वाढीसाठी ग्रामसेवक आणि तलाठी यांनी काम करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी यांनी दिले.
आपेगाव पालखी सोहळ्याला जिल्हाधिकारी यांची शुभेच्छा भेट
संत ज्ञानेश्वरांचे जन्मस्थळ पैठण तालुक्यातील आपेगाव येथून मार्गस्थ होणाऱ्या पालखीस आज जिल्हाधिकारी दिलीप स्वामी सपत्नीक पूजा करुन भेट दिली. यावेळी मार्गस्थ होणाऱ्या पालखीस स्वत:सहभागी होऊन अंभग गायन आणि पाऊली व फुगडी खेळत शुभेच्छा दिल्या. यावेळी ज्ञानेश्वर विष्णु महाराज कोल्हापुरकर यांनी जिल्हाधिकारी यांचे स्वागत केले.